मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावात जून व ऑगस्ट वगळता जुलै आणि सप्टेंबर महिन्यात खूप चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे सध्या सात तलावात मुंबईला पुढील वर्षभर पुरेल इतका म्हणजेच 14 लाख 36 हजार 183 दशलक्ष लिटर (99.23 टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा पुढील 373 दिवस म्हणजेच पुढील 6 ऑक्टोबर 2024 पर्यंत पुरेल इतका आहे. (Mumbai News 99.23 percent water storage in Mumbai lakes Will water cut be avoided?)
वास्तविक, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावात दरवर्षी पावसाळा संपल्यावर म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी पाणीसाठा किती जमा आहे, याबाबत पालिका जल अभियंता खाते आढावा घेते. त्यानुसार, पावसाळा संपल्यावर पुढील वर्षभरासाठी सात तलावात मिळून 14,47,363 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा असणे आवश्यक असते. तरच, मुंबईला पाणीकपातीच्या संकटापासून खऱ्या अर्थाने दिलासा मिळतो. सध्या सात तलावात मिळून 14,36,183 दशलक्ष लिटर (99.23 टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
हेही वाचा – Loksabha Election : दक्षिण मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे गटाची रणनिती; ‘हा’ नेता लढवणार निवडणूक
अनंत चतुर्दशीला सात तलाव क्षेत्रातील अप्पर वैतरणा तलावात 87 मिमी, मोडक सागर तलावात 91 मिमी, मध्य वैतरणा तलावात 43 मिमी, तानसा तलावात 18 मिमी, भातसा तलावात 15 मिमी, विहार तलावात 5 मिमी तर, तुळशी तलावात 6 मिमी इतका पाऊस पडला आहे. अद्यापही कमी-अधिक प्रमाणात तलाव क्षेत्रात पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट दूर झाल्यात जमा आहे.
गणेश चतुर्थीला विघ्नहर्ता गणरायाचे आगमन झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला दहा दिवसांनी विसर्जन करण्यात आले. या काळात दीड,पाच व सात दिवसांच्या गणेशमूर्तींचेही आरती व पूजन करून विसर्जन करण्यात आले. गणराया हा बुद्धिदाता, विघ्नहर्ता असल्याने कदाचित मुंबईकरांच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या गणरायाने मुंबईकरांवरील पाणीकपातीचे ओढवलेले ‘विघ्न’ दूर केले असावे. त्यामुळे आता मुंबईकरांना वर्षभर पाणीकपातीपासून दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा – …तर ठाणेकरांचा टोल प्रश्न त्वरित मार्गी लागेल; आनंद परांजपेंनी राज ठाकरेंकडे केली मागणी
भातसा व अप्पर वैतरणा भरण्याच्या मार्गावर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तानसा, मोडक सागर, तुळशी व विहार हे चार तलाव आगोदरच भरून वाहू लागले आहेत. आजही या चार तलावांत 100 टक्के पाणीसाठा जमा आहे. तर, सर्वात जास्त पाणी साठवण क्षमता असलेला भातसा तलावात 7,12,922 दशलक्ष लिटर (99.43 टक्के) इतका तर अप्पर वैतरणा तलावात 2,25,119 दशलक्ष लिटर (99.15 टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला असून पुढील काही तासात या दोन्ही तलावात पावसाची एक जोरदार सर पडल्यास तलाव भरून वाहू लागतील. तसेच, मध्य वैतरणा तलावातही सध्या 1,89,292 दशलक्ष लिटर (97.87 टक्के) इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. या तलावातही जोरदार पाऊस पडल्यास ते भरून वाहू लागेल. त्यामुळे सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव जवळजवळ भरलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना ‘विघ्नहर्ता’ गणराया पावला आहे. त्याच्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट दूर झाले आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्र्यांपाठोपाठ विधानसभा अध्यक्षांचाही परदेश दौरा रद्द; ठाकरे गटाची खेळी यशस्वी
30 सप्टेंबर रोजी सकाळी 6 पर्यंत सात तलावातील पाणीसाठा व वाढ
तलाव पाणी पुरवठा आजची क्षमता पातळी दशलक्ष लि.
अप्पर वैतरणा 2,27,047 2,25,119
मोडकसागर 1,28,925 1,28,925
तानसा 1,45,080 1,44,181
मध्य वैतरणा 1,93,530 1,89,292
भातसा 7,17,037 7,12,922
विहार 27,698 27,698
तुळशी 8046 8046
———————————————————-
एकूण पाणीसाठा 14,47,363 14,36,183