मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे शहारातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. तर आत्तापर्यंत ३० नागरिकांचा या पावसाने बळी घेतला आहे. यामुळे मोठा आर्थिक फटका नागरिकांना सहन करावा लागला आहे. यात कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये पालिकेच्या अंडरग्राउंड पार्किंगमध्ये पावसांच पाणी शिरलं आहे. यामुळे ४०० हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. या सर्व गाड्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्किंगमझ्ये जवळपास २० फुटांपर्यंत पाणी साचले आहे.
कांदिवलीतील पार्किंग भागात मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. मात्र दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या तुफान पावसामुळे पार्किंग भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. या पार्किंगमध्ये सर्वाधिक कार आणि रिक्षा पार्क करण्यात आल्या होत्या. या सर्व गाड्या आता पाण्याखाली गेल्या आहेत. मात्र पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गाड्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु झाले आहे. मात्र गाड्यांचे पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या अग्निशमन दलाकडून पार्किंगमधील साचलेलं पाणी पंपाच्या साहाय्याने बाहेर काढले जात आहे.