राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने मुंबईत आजपासून इयत्ता १ ते ७ वीचे वर्ग सुरु झाले आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रात तब्बल दीड वर्षांहून अधिक काळानंतर पहिली ते सातवीच्या शाळा सुरु झाल्या आहे. महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी मुंबई महापालिकेतील शाळा बुधवारीपासून सुरु करण्याचे आदेश दिले होते. यानंतर मुंबईतील अनेक भागांतील शाळांत विद्यार्थी तसेच शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळांमध्ये विद्यार्थी तसेच शिक्षण, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली.
सध्या मुंबई महानगपालिकेच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या १ ली ते ७ च्या एकूण २०३४ शाळा आहेत. यातील आज जवळपास १९०२ शाळा सुरु झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेच्या इमारतींचे शंभर टक्के निर्जंतुकीकरण करण्यात आले. महापालिकेनं आजपासून पूर्ण क्षमतेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
या शाळांमधील १ ते ७ वीच्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ही ५,९१,८८२ इतकी आहे. मात्र यातील फक्त २,००,६३९ विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत पाठवण्यासाठीचे संमती पत्र दिले आहे. म्हणजेच केवळ ३४ टक्के विद्यार्थी शाळांमध्ये हजर होणार आहेत.
यात इयत्ता १ ली ते ७ वीच्या शाळांमध्ये शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या ही २१, ३१० इतकी आहे. यात जवळपास २०,२१२ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र महापालिकेने सर्व शाळांना विद्यार्थ्यांसाठी मास्क , थर्मल गन, प्लस ऑक्सिमिटर, इमारत निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराईड इ. चा पुरवठा केला आहे.(Maharashtra School Reopen)