मुंबईत कोरोनाचा फैलाव खूप वेगाने वाढला आहे. दररोज ७ ते ८ हजार कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे आता मुंबईत पुन्हा कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबईतील शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पहिली ते नववीचे आणि अकरावीचे वर्ग उद्यापासून ते ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरातील शाळांबाबतचा निर्णय देखील आज होण्याची शक्यता आहे.
कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे १५ डिसेंबरपासून पहिली ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. पण मुंबईत सध्या कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण मुंबईत आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये राज्यभरातील शाळांबाबतचे आज निर्णय होणार आहेत. त्यापूर्वी मुंबई महापालिकेने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या पहिली ते नववीचे आणि अकरावीचे वर्ग उद्या, ४ जानेवारीपासून ते ३१ जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे.
मुंबई पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मुंबईत काल, रविवारी नव्या कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ६८९ वाढली होती म्हणजेच आज ८ हजार ६३ नव्या रुग्णांची नोंद झाली. काल, शनिवारी मुंबईत ६ हजार ३४७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली होती. ही संख्या काल दीड हजारांहून वाढली आहे. तसेच काल एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसून ५७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते.
हेही वाचा – मुलांना दिली जात आहे एक्सपायरी डेट झालेली लस?