जगभरात धुमाकूळ घालणारा करोना आता मुंबईत येऊन देखील धडकला आहे. सगळीकडे पसरत असलेला हा आजार आणखी पसरु नये, यासाठी आता खबरदारी घेण्यात येत आहे. दरम्यान, अनेक खासगी शाळांनी १३ ते ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यामध्ये सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांचा देखील समावेश आहे. तर काही शाळांनी आपल्या परीक्षा देखील पुढे ढकलल्या आहेत. करोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबईतील काही शाळांनी हा निर्णय घेतला आहे.
या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरु राहणार
फोर्टमधील कॅनन स्कूलने १३ ते ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळेच्या प्रशासनाने पालकांना ई – मेलद्वारे शाळा बंद ठेवण्यात आल्याच्या निर्णयाची माहिती दिली असून ही शाळा ३१ पर्यंत बंद राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. करोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली असून त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करुन संसथेने शाळा बंद ठेवण्यचा निर्णय घेतला असल्याचे पालकांना कळवळे आहे. त्यासोबतच यादरम्यान कोणतेही कार्यक्रम होणार नसून विशेष वर्ग देखील घेतले जाणार नाहीत. मात्र, या निर्णयातून दहावी, बारावीची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरु राहणार आहेत.
उन्हाळी सुट्टी जाहीर
दरम्यान, एका आयबी मंडळाच्या शाळेनेही उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार, पहिली ते आठवीचे वर्ग १३ मार्चपासून बंद राहतील. विद्यार्थ्यांना यापूर्वीच्या परीक्षेतील गुणांनुसार अंतिम परीक्षेत गुण देण्यात येणार आहेत.
हेही वाचा – दिलासादायक! चीनमध्ये करोनाचा जोर ओसरला