मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख (वय ५४) यांचे आज निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रासले होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचर सुरु असतानाच अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने उच्च शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. अजय देशमुख हे यापुर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून कार्यभार सांभाळत होते. तसेच यापुर्वी त्यांनी कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंटच्या संचालक मंडळावर देखील काम केले होते. १४ जानेवारी २०१९ रोजी त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.
डॉ. अजय देशमुख यांनी एम.ए. इंग्रजी विषयात पदव्यूत्तर शिक्षण घेतले होते. मुंबई विद्यापीठातील एक वर्षाच्या कामगिरीत त्यांनी आपली छाप सोडली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने अमरावती आणि मुंबई विद्यापीठातील त्यांच्या सहकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.