गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी मुंबई शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या दूर केली जाणार आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. येत्या शनिवारपर्यंत याबाबतचा अहवाल प्राप्त होणार असून त्यानंतर खड्ड्यांचा प्रश्न निकाली काढला जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री तसेच मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. गणेशोत्सव पूर्व तयारीच्या अनुषंगाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात आज बैठक घेण्यात आली.
गणेशोत्सवापूर्वी मुंबई खड्डेमुक्त होणार
गणेशोत्सवाचे आगमन आणि विसर्जन या मुद्यांवर यावेळी साधक बाधक चर्चा करण्यात आली. गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावर्षापासून गणेश मंडळांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. त्यावर काहींनी सूचना कळवल्या. ऑनलाइन सोबत ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची मागणी करण्यात आली. ऑनलाइन पद्धत योग्य असून यामुळे एकाच ठिकाणी पोलिस, महापालिका, अग्निशमन दलाचा परवाना प्राप्त होणार असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मंडळाच्या प्रतिनिधींना वार्डनिहाय प्रशिक्षण देण्याची तयारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दर्शविली. त्याला सर्वांना सहमती दिली असल्याचे ते म्हणाले.
विसर्जनासाठी तात्पुरती जेट्टी उभारण्यावर चर्चा
विसर्जनासाठी चौपाट्यांवर तात्पुरत्या स्वरुपातील जेट्टी उभारण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. यामुळे चौपटीवर उशिरापर्यंत चालणारे विसर्जन विनाविलंब सुरळीत पार पडेल. तसेच किनाऱ्यापासून दूर अंतरावर मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल. यामुळे मूर्तीचे निर्माल्य किनाऱ्यावर येणार नाही. जेट्टी उभारण्याबाबत सर्व बाबी तपासून एका आठवड्यात निर्णय घेतला जाणार आहे.
शहरातील खड्ड्यांचा अहवाल तयार करणार
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व खड्ड्यांचा अहवाल तयार करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे. आठवडाभरात कारवाईचा अहवाल सादर केला जाणार आहे. येत्या शनिवारी अहवाल येणार आहे. त्यावर चर्चा करून उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे भरले जातील. आयुक्तांनी तशा सूचना दिलेल्या आहेत. शनिवारी याचा अहवाल त्या खात्यातील अधिकारी सादर करणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे भरले जातील.