राज्यात मान्सूनचे आगमन होताच मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मुंबईतही अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु, मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून मुंबईतील किमान तापमानात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, मुंबईकरांची घामाच्या धारांपासून आता मुक्तता होऊ शकेल. पुढील काही दिवसांत पाऊस पुन्हा जोर धरणार असल्याचे संकेत हवामान खात्याने (IMD) दिले आहेत. येत्या शनिवार आणि रविवारसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून मुंबई व ठाण्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रायगडसाठी ऑरेंज अलर्ट
तसेच रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रायगडातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस होऊ शकेल. रविवारी पश्चिम-मध्य आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा टप्पा तयार होण्याची शक्यता असल्याने पाऊस पुन्हा जोर धरू शकेल. दरम्यान, बुधवारी मुंबई आणि ठाण्याच्या काही भागांमध्ये काही काळ रिमझिम पाऊस पडला.
२.६६ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध
मागील २४ तासांत (मंगळवार सकाळी ८.३० ते बुधवार सकाळी ८.३०) हवामान खात्याच्या कुलाबा येथील वेधशाळेने १५ मिमी, तर सांताक्रूझ वेधशाळेने १७.९ मिमी पावसाची नोंद केली. तसेच १ जूनपासून आतापर्यंत कुलाबा वेधशाळेनुसार ७१४.६ मिमी आणि सांताक्रूझ वेधशाळेनुसार ९८७ मिमी पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये २.६६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.