पहाटे बोचणारी थंडी, दिवसा मध्येच लागणारे चटके, त्यातून निघणाऱ्या घामाच्या धारा मग पुन्हा संध्याकाळी लागणार गारवा अशा वातावरणाचा सध्या मुंबईकर सामना करत आहेत. मुंबईत नोव्हेंबर महिन्यापासूनच थंडीची चाहूल लागते. पण, उशीरा गेलेल्या पावसामुळे मुंबईत अजूनही हवी तशी थंडी पडलेली नाही. त्याचाच परिणाम म्हणून मुंबईच्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे.
मुंबईतील हे असे तापमान वातावरणातील विषाणूंसाठी अत्यंत पूरक असतं. त्यातून होणाऱ्या श्वासाच्या समस्या, सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी आणि अॅलर्जी असे आजार बळावले आहेत. हवेत असणाऱ्या विषाणुंच्या प्रादुर्भावामुळे संसर्गजन्य आजारांच्या प्रमाणात ही वाढ होत आहे.
पालिकेच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल होणारे रुग्ण सध्या व्हायरल ताप, वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या संसर्गामुळे आजारी पडल्याचं सांगतात. घसा दुखी, घशाच्या संसर्ग, सर्दी, खोकला, ताप या आजारांमध्ये गेल्या आठवड्यापासून वाढ झाली असल्याचं डॉक्टर्स सांगतात.
पालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये गेल्या आठवड्यात ओपीडीत तापाचे ८५, गॅस्ट्रोचे ७४ आणि इतर आजारांचे ५८ रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी ५० रुग्णांना उपचार देऊन घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या तिन्ही हॉस्पिटलचे प्रमुख आणि संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे.
” मुंबईत आता हळूहळू थंडी जाणवायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे, थंडीतही रुग्णांचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे, दररोज किमान २० ते २५ रुग्ण दररोजच्या ओपीडीसाठी सर्दी, खोकला, घशाची खवखव, सीओपीडीच्या महिला, लहान मुलं दाखल होतं आहेत. त्यासोबतचं ७ वर्षांच्या वरील मुलं शिवाय, लहान मुलं ही किमान १० ते १५ दाखल होत आहेत. ज्यांना अस्थमाचा त्रास आहे. ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो त्यांना लगेचच सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. ”
डॉ. मधुकर गायकवाड , वैद्यकीय अधीक्षक , सेंट जॉर्ज हॉस्पिटल