अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या मालाडमध्ये एक महिन्यापूर्वी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतरही कुठेही या विषाणूचा संसर्ग अधिक पसरु न देता काही प्रमाणात त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळेच ज्या भागांमध्ये महिनाभरापूर्वी रुग्ण आढळून आले, त्या भागांमध्ये दोनशेहून अधिक कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली आहे, परंतु मालाडमध्ये ही संख्या १०० च्या आसपासच आहे. त्यामुळे मालाड-मालवणी आदी भाग पाहता दाटीवाटीने वसलेल्या लोकसंख्येचा अंदाज येतो. त्या भागांमध्ये कोरोना कोविडचा संसर्ग पसरु न देता ही गती संथ राखण्याचा प्रयत्न महापालिकच्या पी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त आणि त्यांच्या सर्व अधिकारी,कामगार व कर्मचारी वर्गाने केला आहे.
महापालिकेचा पी-उत्तर विभाग अर्थात मालाडच्या पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये मोठ्याप्रमाणात झोपडपट्टी वसलेली आहे. मालाड मालवणी असो वा कुरार व्हिलेज अशी केवळ नावे जरी घेतली तरी तेथील एकमेकांना खेटून असणारी घरे आणि त्यातील दाटीवाटीने असलेली लोकवस्तू आदींचा अंदाज येतो. पालकमंत्री अस्लम शेख आणि शिवसेना आमदार सुनील प्रभू यांचा विधानसभा असलेल्या ६ एप्रिल रोजी मालाड भागांमध्ये ३२ रुग्ण होते. या ३२ रुग्णांसह मालाडचा परिसर हा कोरोनाग्रस्तांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये होता. त्यावेळी निश्चितच जी-दक्षिण विभागामध्ये ७८ रुग्ण होते. परंतु आज जी-दक्षिण विभाग सहाशेच्या उंबरठ्यावर उभा आहेत. तर मालाडमध्ये आज ही संख्या १२०च्या लगबग आहे. मात्र आज या कोरोनाग्रस्तांच्या क्रमवारीत १५ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे झोपडपट्टी बहुल असलेल्या या विभागात काही अंशी कोरोनाचा संसर्ग थोपवून धरण्याचा प्रयत्न पी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त संजोग कबरे आणि त्यांच्या टिमने केल्याचे दिसून येते.
आज मालाडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १०० पार झाली असली तरी पी-उत्तर विभागातील महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच विभाग कार्यालयातील देखभाल विभाग, घनकचरा विभाग, किटकनाशक विभाग आदींसह महापालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांच्या टिमचे हे यश असल्याचे कबरे यांनी व्यक्त केले. सध्या दर दिवशी सरासरी ४ ते ६ रुग्ण आढळून येत आहेत. पहिला रुग्ण आढळून आल्यापासून महापालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना विश्वासात घेवून एकप्रकारची आखणी केली आहे. त्यांना दिलेल्या प्लॅननुसार ते काम करत आहेत. सध्या क्वारंटाईनमधील १२५ बेडची क्षमता आहे. परंतु काही लॉज आणि तीन इमारतीही ताब्यात घेतल्या आहेत. ज्यामुळे अजुन ३०० ते ३५० बेड्सच्या क्वारंटाईनची व्यवस्था केली आहे. आतापर्यंत या विभागांमध्ये ४८ बाधित क्षेत्र होती. त्यातील ३ क्षेत्र कमी झाली आहेत. आता केवळ ४५ बाधित क्षेत्र आहेत. आतापर्यंत २१ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत तर ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे कबरे यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा – कोरोनामुळे सैनिकांची शिस्त बिघडली? आर्मी कट करायला न्हावीच मिळेना!