राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी कोरोनाच्या काळात खासगी रूग्णालयात घेतलेल्या उपचाराची लाखो रूपयांच्या बिलाची आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाच्या काळात मंत्री जनतेचा पैसा वापरून पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे. सरकारकडे फक्त मंत्र्यांवर उधळायला पैसे आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारातून मिळवण्यात आलेल्या माहितीमध्ये राज्यात सर्वाधिक हॉस्पिटल उपचाराचा खर्च हा राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्वाधिक असा राजेश टोपे यांचा ३४ लाख ४० हजार रूपयांचा खर्च हा खासगी हॉस्पिटलमध्ये झाल्याचे वृत्त दैनिक दिव्य मराठीने दिले आहे. जनता उपाशी आणि मंत्री तूपाशी! हीच का तुमची शिवशाही? असा सवाल भाजपचे अतुल भातखळकर यांनी केला आहे.
जनतेला सरकारी हॉस्पिटलसाठीही रखडावं लागत होतं त्या कोरोना काळात काळात मंत्री जनतेचा पैसा वापरून पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. सरकारकडे फक्त मंत्र्यांवर उधळण्यासाठी पैसे आहेत.
जनता उपाशी आणि मंत्री तूपाशी!हीच का तुमची शिवशाही? pic.twitter.com/H1cv85pUiQ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 21, 2022
सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा क्रमांक हॉस्पिटलमध्ये खर्च करण्याच्या यादीत अव्वल आहे. राजेश टोपे यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याचे टाळत, ३४ लाख ४० हजार ९३० रूपये इतका उपचारासाठीचा खर्च केल्याचे निष्पन्न झाले आहे. तर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी १७ लाख रूपये, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १४ लाख, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार १२ लाख, जितेंद्र आव्हाड ११ लाख, छगन भुजबळ ९ लाख, सुनील केदार ८ लाख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील ७ लाख, सुभाष देसाई ७ लाख, अनिल परब ६ लाख ७९ हजार अशा रीतीने मोठ्या प्रमाणात खासगी हॉस्पिटलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पैसे खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.
हीच का तुमची शिवशाही ?
कोरोनाच्या काळात सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या जनतेच्या निमित्ताने भाजपचे प्रवक्ते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी काही प्रश्न केले आहेत. ते म्हणाले की, ”जनतेला सरकारी हॉस्पिटलसाठीही रखडावं लागत होतं त्या कोरोना काळात काळात मंत्री जनतेचा पैसा वापरून पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. सरकारकडे फक्त मंत्र्यांवर उधळण्यासाठी पैसे आहेत. जनता उपाशी आणि मंत्री तूपाशी! हीच का तुमची शिवशाही? असाही सवाल भातखळकर यांनी केला आहे.