शहरात टायफॉईड रुग्ण अल्प प्रमाणात असताना ते ४ ते ५ हजार असल्याचे दाखवून जगातील पहिले मोफत टायफॉईड लसीकरण अभियान आपल्याच शहरात राबवण्याचा अट्टाहास करणार्या नवी मुंबई मनपाचा लसीकरण घोटाळा उघडकीस आला आहे. लस देण्यात येणार्यांच्या संख्येबाबत कोणताही सर्व्हे न करता मनपाने या अभियानासाठी तब्बल ६ कोटींची तरतूद केल्याने मनपाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे हे अभियान वादाच्या भोवर्यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जगातील पहिले टायफॉईड कंज्युगेट लसीकरण अभियान
राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार पटकविल्यानंतर आता केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक आरोग्य विषयक अभियानात नाव कोरले जावे याकरता मनपाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रस्तावानुसार जगातील पहिले टायफॉईड कंज्युगेट लसीकरण अभियान नवी मुंबईत राबविण्याचा निर्णय मनपा आयुक्तांनी घेतला आहे. यासाठी तब्बल ६ कोटी खर्च करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ शनिवारी सकाळी महापौरांच्या प्रभागात त्यांच्याच हस्ते करण्यात येणार आहे.
मुलांची कोणतीही माहिती मनपाकडे
अभियानात शहरातील तब्बल ४ लाख मुलांना या लसी देण्यात येणार असून त्यातील 1 लाख लसी (डोस) उत्पादक कंपनीकडून नवी मुंबई मनपाला पूर्णत: मोफत मिळणार आहेत. उर्वरित 3 लाख लसी या प्रतिलस (डोस) 200 रुपये या नाममात्र दरात मिळणार आहे. यासाठी 6 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.मात्र ज्या ४ लाख मुलांना डोस देण्यात येणार आहे. त्या मुलांची कोणतीही माहिती मनपाकडे नसल्याचे समोर आले आहे. जाहिरातींच्या माध्यमातून जी मुले येतील त्यांनाच डोस देण्यात येतील मग ४ लाख मुलांचा आकडा आला कुठून आला हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार
शहरात टायफॉईड रुग्णांची संख्या १०० च्या आतच आहे. असे असताना मनपाने अभियानांतर्गत छापण्यात आलेल्या पत्रकात दरवर्षी ४ ते ५ हजार जणांना टायफॉईड होतो असे नमूद केल्याने मनपाच्या आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार ही चव्हाट्यावर आला आहे. कोणतेही अभियान सुरू करण्याअगोदर त्याची जनजागृती करण्यात येते. तशीच जनजागृती या अभियानाचीही ८ दिवस अगोदर तयारी करण्यात येईल असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके यांनी सांगितल्यानंतर कोणतीही जनजागृती न करता हे अभियान शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहे. हे अभियान सुरू करत असताना मोठ्या प्रमाणात कर्मचार्यांची गरज असताना त्यांचा भार नागरी आरोग्य केंद्रात असणार्या कर्मचार्यांच्या अंगावर टाकण्यात आला आहे. त्यामुळे हे कर्मचारी नागरी आरोग्य केंद्रात येणारे रुग्ण बघणार की टायफॉईड लसीकरण अभियानांतर्गत येणार्या मुलांना लसी देणार, असा प्रश्न आहे.
टायफॉईड कंज्युगेट लस ही ९ ते १५ वयोगटातील मुलांना देण्यात येणार असून पहिल्या टप्यात तब्बल २ लाख मुलांना ती देण्यात येणार आहे.या बाबत कोणताही सर्व्हे झाला नसला तरी पालक आपल्या मुलांना लस देण्यासाठी आमच्या बूथवर घेऊन येतील. मुलांना लस देणे बंधनकारक नाही. तर ज्यांनी यापूर्वी लस घेतली आहे. त्यांनाही ही लस घेता येणार नाही. त्यामुळे अभियानानंतरच किती मुलांनी लस घेतली हे स्पष्ट होणार आहे.- -एन.रामस्वामी – आयुक्त ,नवी मुंबई महापलिका
शहरात ग्रामीण आणि झोपडपट्टी असे भाग असून यातील अनेक मुलांना हेही माहित नाही कि त्यांनी कोणती लस घेतली आहे. अथवा त्यांच्या पालकांनाही याची कल्पना नाही. मनपाने जाहीर केल्यानुसार जर एखाद्या मुलाने लस घेतली असेल तर त्याला पुन्हा घेता येणार नाही. अशा मुलांचा सर्व्हे झाला नसून तो आधी करण्याची गरज आहे. त्यामुळे मनपाने अगोदर ज्यांना खरोखरच लसीची गरज आहे. अश्यांचा सर्व्हे करावा.
-विजय चौगुले – विरोधी पक्ष नेता , नवी मुंबई महापलिका