राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्ते असलेले नवाब मलिक यांच्यावर विरोधकांकडून आणि विशेषत: भाजपकडून निशाणा साधला जात आहे. राज्य सरकारमध्ये अल्पसंख्याक मंत्री असलेल्या नवाब मलिक यांचा जावई समीर खानला एनसीबीनं (Narcotics Control Bureau) बुधवारी अटक केली. ड्रग्ज माफिया करन सजनानीसोबत समीर खानचे ड्रग्जसाठीचे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप एनसीबीनं ठेवला आहे. या प्रकरणी आता नवाब मलिक यांना लक्ष्य केलं जात असताना त्यांनी आपली भूमिका ट्वीटरच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे. ‘कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही’, अशा आशयाचं ट्वीट नवाब मलिक यांनी आज सकाळी केलं आहे.
काय म्हणाले नवाब मलिक?
आपल्या ट्वीटमध्ये नवाब मलिक म्हणतात, ‘कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. आणि कायदा सगळ्यांना कायदा समानच लागू केला गेला पाहिजे. या प्रकरणीही कायदा आपल्या पद्धतीने काम करेल आणि न्याय होईल. माझा आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रचंड विश्वास असून आदर आहे.’
Nobody is above the law and it should be applied without any discrimination.
Law will take its due course and justice will prevail.
I respect and have immense faith in our judiciary.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 14, 2021
करन सजनानीला एनसीबीनं काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याच्या चौकशीमध्ये समीर खानचं नाव समोर आल्यानंतर समीर खानला चौकशीसाठी बोलावण्यात आलं. यामध्ये समीर खान दोषी आढळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. यानंतर नवाब मलिक यांना लक्ष्य केलं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवाब मलिक यांची पाठराखण केली आहे.
नवाब मलिक यांच्या जावयानं जर काही गुन्हा केला असेल, तर त्याची चौकशी झाली पाहिजे. चौकशीतून सर्वकाही समोर येईल. राज्य सरकार त्यात हस्तक्षेप करणार नाही. पण जावयाचं कुटुंब स्वतंत्र असतं. जावयानं काही गुन्हा केला, तर त्याची शिक्षा सासऱ्यानं का भोगावी?
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
नवाब मलिक यांच्या घरातल्या एका सदस्यावर केंद्रीय पथकाची कारवाई झाली आहे. नवाब मलिक सातत्याने महाविकासआघाडीची बाजू मांडत असतात. आता हे नक्की काय झालंय मला माहिती नाही. आजही तृणमूल काँग्रेसच्या एका प्रमुख नेत्याच्या घरी ईडीने धाडी घातल्या. यामुळेच लोकांच्या मनात संशय निर्माण होत असतो की हे ठरवून केलं जात आहे का? केंद्रात आणि राज्यात वेगळी सरकारं असतात, तेव्हा या अशा गोष्टी घडत असतात. सरकार कोणतंही असो.
संजय राऊत, खासदार, शिवसेना