लोकसभा निवडणुकांचा गेल्या २ ते अडीच महिन्यांपासून सुरू असलेला ज्वर आता पराकोटीला पोहोचला असून २३ तारखेची प्रचंड उत्सुकता सगळ्यांना आहे. त्यातच एक्झिट पोलने कौल भाजपच्या पारड्यात टाकल्यामुळे तर सगळ्यांनाच आता २३ तारखेची उत्कंठा लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रचारातून मोकळी झालेली नेतेमंडळी आपापल्या वैयक्तिक आणि पक्षीय कार्यक्रमांना लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इफ्तार पार्टी आयोजित केली होती. यावेळी केदारनाथमध्ये गुहेत ध्यानधारणा करण्यासाठी गेलेल्या मोदींवर त्यांनी खोचक टीका केली. ‘सरकारचं काम आहे लोकांच्या समस्यांचं निराकरण करणं. पण सध्या ज्यांच्या हाती सत्ता आहे, ते हिमालयात जाऊन बसले आहेत’, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
‘एक्झिट पोलमुळे नौटंकी सुरू!’
दरम्यान, देशभरात एक्झिट पोलमुळे निर्माण झालेल्या भाजपकेंद्री वातावरणावर शरद पवारांनी यावेळी बोलताना टीका केली. ‘मतदान संपलं आहे. कुणाचं सरकार येणार, हे काही दिवसांमध्येच कळेल. पण कालपासून माध्यमांमध्ये विशिष्ट प्रकारचं वातावरण तयार केलं जात आहे. कितीतरी लोकांनी मला फोन करून चिंता देखील व्यक्त केली आहे. रात्रीपासून ही नौटंकी सुरू आहे. पण नौटंकी बघून तिथल्यातिथे सोडून द्यायची असते, घरी घेऊन जायची नसते’, असं पवार म्हणाले. तसेच, ‘देशातलं वातावरण नक्की बदलेल, असा मला विश्वास आहे’, असं देखील पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांना ० जागा! एक्झिट पोलचा अंदाज
१९ तारखेला सातव्या टप्प्यासाठीचं मतदान संपल्यानंतर सर्वच प्रसारमाध्यमांनी विविध सर्वेक्षण संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर केली. यामध्ये बहुतेक संस्थांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी बहुमत मिळेल, असा दावा केला आहे. त्यामुळे विरोधकांच्या प्रयत्नांना यश न मिळाल्याचंच या आकडेवारीवरून सांगितलं जात आहे.