मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेर्धात राष्ट्रवादी काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं. घाटकोपरमधील रस्त्यांना महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, प्रमुख अभियंता (रस्ते), उपप्रमुख अभियंता (रस्ते) असं नामकरण करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. मुंबईत यंदा कुठेही खड्डे पडणार नाही, असा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला होता. परंतु, पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडल्याचे चित्र जागोजागी पाहायला मिळत आहे. शहरासह उपनगरातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून हे खड्डे बुजवण्यास प्रशासनाला अपयश येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पाळणा म्हणत पेढे, घुगऱ्या वाटप
खड्ड्यांमुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने सुरूवातीला प्राधान्य १, २ ची कामं केली. मात्र प्राधान्य ३ ची रस्त्यांची कामे सुरु आहेत. गेल्या वर्षी पालिकेने खड्डे बुजवले होते. परंतु, या सर्वांची हमी कालावधी असताना आणि जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करूनही खड्डे पडतातच कसे, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या महापालिका गटनेत्या राखी जाधव यांच्या नेतृत्वात ईशान्य मुंबईतील पदाधिकारी कार्यकर्त्यांसह अनोखं आंदोलन केलं. यावेळी घाटकोपर पूर्व येथील यशवंतशेठ जाधव मार्गावर मोठे खड्डे पडल्याने त्यांना महापालिका आयुक्त, महापालिका अतिरिक्त आयुक्त, प्रमुख अभियंता (रस्ते), उपप्रमुख अभियंता (रस्ते) असे पाळणा गीत म्हणत, आणि पेढे व घुगऱ्या वाटून नामकरण करण्यात आलं.
वाचाः कल्याणमध्ये खड्ड्यांचा पाचवा बळी
आंदोलन तीव्र करणार
आज केवळ प्रतीकात्मक नामकरणाचा सोहळा पार पाडत आंदोलन केलं आहे. मात्र हे खड्डे तातडीने न बुजल्यास खड्ड्यांमध्ये नामकरणाचा फलक उभारून मोठं आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा जाधव यांनी दिला.