केरळमधील नागरिकांना सध्या निपाह व्हायरसचा तडाखा बसतो आहे. आतापर्यंत अनेकांना या व्हायरसमुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे केरळमधील निपाह विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे केरळ राज्यातून मुंबईत परतणाऱ्या लोकांना भेदभावाची वागणूक देऊ नये, त्यांचा अपमान करु नये, अशा सूचना राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत. केरळहून परतणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्रात अपमान सहन करावा लागत असल्याप्रकरणी अनेक तक्रारी आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. केरळला पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांना निपाह व्हायरसची लागण झाली असेल या विचारानेच त्यांना भेदभावाची वागणूक दिली जाते असं सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात निपाहचा रुग्ण आढळलेला नाही
महाराष्ट्रात आजही निपाहचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांनी घाबरण्याचं काही कारण नसल्याचं याआधीच आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी सांगितलं होतं. त्यानुसार विशेष उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत. पण, तरीही या विषाणूंची केरळमध्ये लागण झाली असली तरीही संपूर्ण भारतात त्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने त्याबाबत आवश्यक ती पाऊले उचलायला सुरूवात केली आहे. निपाह सदृश्य आजाराचे सर्वेक्षण आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत असून त्याबाबत सर्वसामान्यांना घाबरून न जाण्याचं आवाहन आरोग्य संचालनालयाद्वारे करण्यात आलं आहे.
भेदभावाची वागणूक देऊ नका
‘‘ केरळहून परतणाऱ्या पर्यटकांचा अपमान केल्याच्या काही तक्रारी आम्हाला मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात अजून एकही रुग्ण आढळलेला नाही. निपाह आजाराचा उद्रेक हा अत्यंत मर्यादित स्वरूपाचा असून प्रवास आणि पर्यटनावर कोणत्याही प्रकारचं निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. त्यामुळे केरळ राज्यातील किंवा केरळहून परतणाऱ्या नागरिकांसंदर्भात भेदभावाची वागणूक देऊ नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ’’
डॉ. संजीव कांबळे , संचालक, आरोग्य सेवा संचालनालय