राज्यासह मुंबईत कोरोनाचा दुसऱ्या लाटेने भयावह स्थिती निर्माण झाली असली तरी मुंबईतील परिस्थिती हळुहळु नियंत्रणात येत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्ससाठी हेळसांड झाली. मात्र काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेने उपाययोजना करत बेड्स, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनमध्ये सुसूत्रता आणत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या करोना लढ्याची दखल सर्वोच्च न्यायालयाच्या पाठोपाठ आता केंद्र सरकारच्या नीती आयोगानेही घेतली आहे. मुंबईचे कोविड व्यवस्थापन हे प्रेरणादायी असल्याचे ट्विट नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सोमवारी केले.
मुंबईत झपाट्याने वाढलेला करोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून पुन्हा नियंत्रणात येऊ लागला आहे. निर्बंधांची कठोर मात्रा, ऑक्सिजनचे व्यवस्थापन यामुळे रुग्ण संख्या आटोक्यात येण्यास मदत झाली. तसेच, महापालिकेने तातडीने काही उपाययोजना राबवल्या होत्या. ऑक्सिजन बेडची माहिती, रुग्णालयाची माहिती, रेमडेसिव्हीर याचेही नियोजन करण्यात आले. या नियोजनामुळे करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यात यश आले.
महापालिकेच्या या प्रयत्नांची कांत यांनी दाखल घेतली आहे. ‘केंद्रीय पद्धतीने बेडचे वाटप करणे, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणे, इतकेच नाही तर खासगी रुग्णालयातील बेडचेही वाटप करणे आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबॉर्ड तयार करणे, रुग्णांच्या प्रकृतीबद्दल पाठपुरावा करण्यासाठी वॉर रुम निर्माण करणे हे करोना व्यवस्थापनाचे मुंबई मॉडेल प्रेरणादायी आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि त्यांच्या ग्रेट टीमचे अभिनंदन,’ असे म्हणत अमिताभ कांत महापालिका आणि आयुक्तांचे कौतुक केले आहे.