जगभरात कोरोनाबाधित आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आकडेवारीनुसार महाराष्ट्र जर स्वतंत्र देश असता, तर कोरोनाबाधितांच्या संख्येत जगात १६व्या स्थानी असता. आणि महाराष्ट्रात देखील सर्वात जास्त रुग्ण मुंबईत आहेत. त्यामुळे देशभरात सर्वाधिक कोरोनाबाधित आणि रूग्ण असणाऱ्या मुंबईत सध्या कोरोनाचं थैमान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ‘माझी सध्या मुंबईत यायची हिंमत नाही’, अशी प्रतिक्रिया केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. एका ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या विधानावर नेटिझन्सच्या देखील उलट-सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
I don't have any daring to come to Mumbai right now, the way in which the situation is now. I feel the time will definitely change: Union Minister Nitin Gadkari pic.twitter.com/mwcLKJkg07
— ANI (@ANI) June 16, 2020
मुंबईची कोरोना रुग्णसंख्या आता जवळपास ६० हजारांच्या जवळ गेली आहे. त्यात मृतांचा आकडा देखील २२००च्या घरात गेला आहे. त्यामुळे मुंबईतली परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक चिंतेची होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणांवरचा ताण हळूहळू वाढू लागला आहे.
एका ऑनलाईन मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, ‘सध्याच्या परिस्थितीत मुंबईत यायची माझी हिंमत नाही. मुंबईतली सध्याची परिस्थिती कठीण आहे. पण मला वाटतंय की ही स्थिती नक्कीच बदलेल’. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सलग अडीच ते ३ हजार रुग्ण रोज सापडत आहेत. त्यातच मिशन बिगीन अगेनदरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका अधिक वाढला आहे.