कायद्याच्या भाषेत नियम हा सर्वांना सारखाच असतो अथवा असावा. मात्र कोरोना नियंत्रणात येत असल्याचे कारण पुढे करीत पालिका प्रशासनाने यापुढे रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रेन आदी सार्वजनिक वाहनातून ये – जा करणाऱ्यांनाच मास्क लावणे बंधनकारक ठेवले आहे. खासगी वाहनांमधून ये – जा करणाऱ्या धनिकांना, शेठजींना मास्क न लावता फिरण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबईकरांना व मुंबईत बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. कायद्याचे, नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांना प्रत्येकी २०० रुपये दंड आकारण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिले होते. त्यासाठी पालिकेने शहर व उपनगरात ९० पथके तैनात ठेवली. या कारवाईत पालिकेला जवळजवळ १४ कोटी रुपयांपेक्षाही जास्त दंडात्मक वसुलीची रक्कम मिळाली.
#Mumbai | No fine for not wearing masks inside private vehicles, says Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) January 17, 2021
त्यावेळी श्रीमंत, गरीब असे कोणीही विनामास्क आढळून आले, तरी त्याला दंड ठोठावण्यात आला. मात्र आता कोरोना काहीसा नियंत्रणात आल्याचा बहाणा करीत पालिका प्रशासनाने नियमांत बदल केले आहेत. खासगी वाहनांतून प्रवास करताना मास्क घालण्याची अट रद्द करण्यात आली आहे. मात्र सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तोंडावर मास्क बंधनकारक असून विना मास्क आढळल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा पालिकेच्या घनकचरा विभागाने दिला आहे. यासंदर्भातील परिपत्रक लवकरच जारी करण्यात येणार आहे.