गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मुंबईत कोरोनाला आवर घालण्यासाठी आणि बाहेर हिंडणाऱ्यांना घरात बसवण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात येणार असल्याच्या अफवा फिरत होत्या. त्यामुळे मुंबईकरांमध्ये भितीयुक्त चिंता पसरू लागली होती. मात्र, मुंबईत लष्कराला पाचारण करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई पोलिसांनी त्यासंदर्भातलं ट्वीट करून यावर खुलासा केला आहे. तसेच, मुंबईकरांना घरातच थांबण्याचं पुन्हा एकदा आवाहन केलं आहे. त्यामुळे मुंबईत सध्यातरी लष्कर येणार नसल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी अनेक ठिकाणी अजूनही लॉकडाऊनचं उल्लंघन होत असल्याच्या घटना समोर येतच आहेत. प्रशासकीय यंत्रणांसाठी हा काळजीचा विषय ठरला आहे.
We know there is a lot of free time. But it can definitely be utilised to do things better than spreading #rumours ! Neither do you need to hoard essentials nor is the army or paramilitary being called out. Just stay calm & stay home. That’s all we need to do to combat #corona .
— Mumbai Police (@MumbaiPolice) May 7, 2020
लॉकडाऊनच्या नियमांचं सक्तीने पालन व्हावं, यासाठी राज्य सरकारनं मुंबईत लष्कर उतरवण्याचा निर्णय घेतल्याच्या अफवा मुंबई आणि पुण्यात पसरवल्या जात होत्या. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत राज्यातल्या सर्व विरोधी पक्षनेत्यांच्या झालेल्या बैठकीत देखील काही प्रमाणात असा सूर लावला गेल्याची माहिती मिळत होती. मात्र, अखेर, मुंबई पोलिसांनी एक ट्वीट करून त्यावर पडदा टाकला आहे.
देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत!
भारतात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात असून त्यातही सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा लवकरच १० हजारांच्याही पार जाणार असून त्यामुळे मुंबई प्रशासनासाठी आणि एकूणच राज्य सरकारसाठी ही चिंतेची बाब बनली आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या यादीनुसार मुंबईचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला असून मुंबईत अनेक ठिकाणी कंटेनमेंट झोन देखील तयार करण्यात आले आहेत. या झोनमध्ये सर्वच प्रकारचे व्यवहार बंद ठेवण्यात आले असून फक्त मेडिकल आणि क्लिनिक सुरू ठेवण्यात आली आहेत.