कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने विकेंड लॉकडाऊन जाहीर करत अनेक निर्बंध लावले आहेत. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध लावले असले तरी, लांब पल्ल्याच्या गाड्या आणि मुंबई उपनगरीय लोकलसाठी नवीन नियमावली जाहीर केलेली नाही. त्यामुळे लोकलमध्ये उभ्याने प्रवास करण्यावर बंदी आहे किंवा लोकल प्रवासाबाबत सोशल मीडियावरून पसरलेली माहितीमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वेने आखून दिलेल्या वेळेत नियमांचे पालन करून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली. नवीन नियमावलीत लोकल आणि रेल्वे प्रवासावर काही निर्बंध येतील अशी शंका सर्वसामान्यांना होती. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांसाठी वेळेची मर्यादा घालून 1 फेब्रुवारीपासून लोकल सुरू केली. त्यावेळी शासनाने घालून दिलेले नियम होते. तेच नियम कायम ठेवण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. यापूर्वी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या फक्त आरक्षित तिकीट धारकांनाच प्रवेश दिला आहे. तसेच प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकारक आहे. लोकल ट्रेन बदलही वेळेची मर्यादा घातली आहे. त्यांची अंमलबजावणी रेल्वेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नव्या नियमावलीत कोणत्याही प्रकारचा नवीन नियम आतापर्यंत जाहीर करण्यात आलेला नाही.
लॉकडाऊनपूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर दररोज 80 लाख प्रवासी प्रवास करत होते. मात्र, कोरोनाचा पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर 22 लाख आणि पश्चिम रेल्वेवर 16 लाख प्रवासी प्रवास करत आहे. प्रवासी संख्या घटली असली तरी उपनगरीय लोकल सेवा 95 टक्के क्षमतेने सुरू आहे. मात्र, शासकीय आणि खासगी कार्यालयाचे वेळ एकच असल्याने सकाळी आणि सायंकाळी लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने रेल्वेची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे प्रवासी संघटनेकडून खासगी आणि शासकीय कार्यालयाचे वेळेत बदल करण्याची मागणी करत आहे.
लोकलची क्षमता
सध्या मुंबई उपनगरीय लोकल फेर्या मध्य रेल्वेवर 1 हजार 685 आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 1 हजार 300 लोकल फेर्या धावत आहे. तर 12 डब्यांच्या लोकलमधून 1 हजार 200 प्रवासी क्षमता आहे. तसेच 700 प्रवासी प्रवास करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले होते. रेल्वे प्रवासात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी ‘येथे बसू नका’ असे पत्रक सुद्धा आसनावर लावण्यात आले होते. मात्र, प्रवासी या नियमांची अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे प्रवासी संघटनांकडून लोकलमध्ये कोविड नियमांचे अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.