राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली असली तरी राजकीय नेतेच बंदी झुगारून बिनधास्त प्लास्टिकचे बॅनर्स लावताना दिसून येत आहेत.या प्रकाराला मनपा प्रशासनही खतपाणी घालत आहे. एकीकडे कायदे बनवायचे आणि दुसरीकडे ते स्वत:च तोडायचे अशी परिस्थिती राज्यात सर्वत्र दिसत आहे. निवडणुका कोणत्याही क्षणी होऊ शकतात या दृष्टीकोनातून संभाव्य उमेदवार जोरदार बॅनरबाजी करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यात प्लास्टिक बंदी झाल्यानंतर त्यात प्लास्टिकच्या बॅनर्सवरसुद्धा बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिक बॅनर्सला परवानगी देऊ नये, असे आदेशच मनपाला देण्यात आल्यानंतर मनपा प्रशासनाकडून प्लास्टिक बॅनर्स ऐवजी कापडी बॅनरला परवानगी देण्यात आली. मात्र ही परवानगी फक्त नाममात्रच असल्याने आजमितीला सर्रास प्लास्टिकचे बॅनर लावले जात आहेत. मनपाच्या परवाना विभागातच सक्षम अधिकारी नसल्याने कारवाया करायच्या कोणी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी होऊ शकतात या दृष्टीकोनातून संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. एकाने तयारी सुरु केली म्हणून दुसर्याने, असा बॅनरबाजीला ऊत आला आहे.
शिवसेनेचे बेलापूर मतदार संघातील उमेदवार विजय नाहटा यांनी आतापासूनच मतदार संघात तंबू ठोकला आहे. त्यांनी गेल्या अनेक महिन्यात विविध कार्यक्रमाचा वर्षाव केला. प्रत्येक कार्यक्रमावेळी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली. मात्र त्यांच्यावर अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांचे बघून इतरांनीही बिनधास्त बॅनरबाजी सुरु केल्याने प्रशासनाचा लाखोंचा महसूल बुडला आहे. नुकताच भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात सत्ता संपादन मेळावा संप्पन झाला. त्यावेळी त्यांनी शेकडो बॅनर्स शहराच्या विविध भागात लावले, त्यातील बहुतांशी बॅनर्सला परवानगीच नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्या पाठोपाठ शिवसेना,राष्ट्रवादी आणि मनसेही विना परवानगी बॅनर्स लावत असल्याने प्रशासन राजकीय नेत्यांच्या ताटाखालचे मांजर झालेय काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार नहाटा नवी मुंबई महापालिकेत ३ वर्षे आयुक्त राहिले आहेत.त्यांना सर्व नियम माहीत असताना तेही नियम बाह्यकाम करत असल्याने अखेर अशा राजकीय नेत्यानावर अंकुश ठेवणार कोण? शनिवारी लोकनेते गणेश नाईक यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याही अनेक कार्यकर्त्यांनी विनापरवाना बॅनर्सबाजी करायला सुरुवात केली आहे. मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता आहे.त्यांच्या पक्षाचे महापौर अनेक भाषणांमधून नागरिकांना नैतिकतेचे धडे देताना दिसून येतात. मात्र आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना शिस्त लावण्यात त्यांना अपयश येत असल्याने याचा फायदा इतर पक्षातील कार्यकर्तेही घेऊ लागले आहेत.
प्रशासन जरी कापडी बॅनर्सची परवानगी देत असले तरी आजघडीला कोण ते बॅनर लावतेय? सगळीकडे प्लास्टिकचेच बॅनर्स लावण्यात येत आहेत. कापडी बॅनर कुठून आणणार? आमच्याकडे प्लास्टिकचेच बॅनर्स आहेत,काही होत नाही.
-दादासो पडालकर – दादा आर्ट,सानपाडा
राज्य शासनाकडून प्लास्टिकवर बंदी घालण्यात आल्यानंतर प्लास्टिक बॅनर्सवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे आमच्याकडून प्लास्टिक बॅनर ऐवजी कापडी बॅनरसाठी परवानगी देण्यात येते. जर कोणी प्लास्टिकचे बॅनर लावत असतील तर त्याची चौकशी होईल. -प्रकाश वाघमारे – सहाय्यक आयुक्त (परवाना विभाग),मनपा