विक्रोळी, भांडूप आणि चेंबूर येथे ठिकाणी संरक्षक भिंत पडण्याच्या घटनेला मुंबई महापालिका तसेव्ह जिल्हाधिकारी कार्यालयाचा निष्काळजीपणाचा कारणीभूत असून याप्रकरणी उच्चस्तरिय चौकशी करून दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या दोषींविरुध्द कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी केली.
महापालिकेने वेळीच योग्य कार्यवाही केली असती तर आज हे निष्पाप जीव वाचू शकले असते. परंतु महापालिकेने बांधलेली निकृष्ट दर्जाची संरक्षक भिंत या दुर्घटनेला कारणीभूत आहे. मुंबई परिसरात ज्या भागात अशा प्रकारच्या संरक्षक भिंती बांधल्या आहेत त्याठिकाणच्या रहिवाश्यांची सुरक्षिततेची व्यवस्था तात्काळ महापालिकेने करावी.अन्यथा मुंबईतील पावसाळ्यामुळे अन्य ठिकाणीही मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशाराही दरेकर यांनी दिला.
दरेकर यांनी आज विक्रोळी येथील सूर्यानगर, भांडुपमधील मुन्शी महल परिसर आणि चेंबूरमधील भारतनगर येथील घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला.तसेच त्या दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. विक्रोळी येथील दुर्घटनेत अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. काही कुटुंबातील मुले-मुली अनाथ झाले आहेत. अशाच एका कुटुंबाची दरेकर यांनी भेट घेतली. या कुटुंबातील लहान भाऊ-बहिण अनाथ झाली आहेत. त्यांचे सात्वंन करताना दरेकर यांना गहिवरुन आले. या पोरके झालेल्या कुटुंबातील लहान भाऊ-बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी भाजाप घेईल, असे वचन त्यांनी त्या कुटुंबाला दिले.
विक्रोळी,भांडूप,चेंबूर सारख्या दुर्घटना भविष्यात घटना घडू नयेत यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात. निष्पाप मुंबईकरांचे बळी रोज जात आहेत. असा एकही पावसाळा नाही गेला ज्यामध्ये मुंबईकरांनी बळी पाहिले नाहीत. प्रशासन आणि महापालिका यांच्या बेजबाबदारपणाचे हे बळी आहेत, असा आरोप दरेकर यांनी लगावला.
मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यानंतर गेली वर्षोनुवर्षे पाणी तुंबण्याची ठिकाणे तीच आहेत. तरीही पालिका हे थांबविण्यासाठी काहीही ठोस आणि कायमस्वरुपी यंत्रणा उभी करत नाही. विक्रोळीची भिंत जी पडली ती पूर्वीही पडली होती, ती पुन्हा बांधली. पण त्यावेळी निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले. त्यामुळे रहिवाश्यांचा नाहक बळी गेला. यातून धडा घेऊन महापालिकेने आता तरी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही दरेकर यांनी केली.