घरमुंबईपरमवीर सिंग यांनी सरकार पाडण्यासाठी केलेल्या मदतीची...; पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप

परमवीर सिंग यांनी सरकार पाडण्यासाठी केलेल्या मदतीची…; पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप

Subscribe

मुंबई : अँटिलिया स्फोटकाचा कट रचून तसेच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर 100 कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप करून बदनाम करण्याचे षडयंत्र आता उघडे पडले आहे. परमवीर सिंग हे फडणवीसांच्या हातचे बाहुले होते हे आता स्पष्ट झाले आहे. परमवीर सिंगांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून शिंदे फडणवीस सरकारने कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता निलंबन रद्द करून पुन्हा सेवेत येण्यासाठी त्यांना मदत केली आहे. अशी घणाघाती टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केली आहे.

परमवीर सिंग यांच्या निलंबनावर बोलताना पटोले म्हणाले की, कॅटच्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला स्पष्ट आदेश दिले होते की, आपण चौकशी करून आरोपपत्र दाखल करा तसेच परमवीर सिंग यांची विभागीय चौकशी करा. पण शिंदे फडणवीस सरकारने ते केले नाही. परमवीर सिंग यांना निलंबित केले होते, पण त्यांच्या निलंबनाचा दर तीन महिन्याला आढावा घेऊन निलंबनाला मुदतवाढ देणे आवश्यक होते. मात्र शिंदे फडणवीस सरकारने ना परमवीर सिंग यांची विभागीय चौकशी केली नाही आणि त्यांच्या निलंबनाला मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे कॅट न्यायाधिकरणासमोर झालेल्य़ा सुनावनीत राज्य सरकारच्या भूमिकेमुळे परमवीर सिंग यांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती पटोले यांनी दिली.

- Advertisement -

विधानसभा अध्यक्ष असताना मी दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सांगतिले की, परमवीर सिंग यांच्या भ्रष्टाचाराबाबतची फाईल माझ्याकडे काही जणांनी दिली आहे. त्या फाईलची एक प्रतिलीपी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाही संबंधिताने दिल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर परमवीर सिंग मला भेटायला आले असता त्यांना मी याबाबत विचारले असता, त्यांनी उत्तर दिले की, आमच्या खात्यात असे चालते. यावरून हे स्पष्ट होते की, परमवीर सिंग यांच्या भ्रष्टाचाराची संपूर्ण माहिती पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला असूनही त्याच्यावर कारवाई होणे दूरच, त्यांची साधी चौकशीही भाजपा सरकारने केली नाही, असा आरोप पटाेले यांनी केला.

अँटिलीया जवळ स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करणे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करणे, हे सर्व प्रकार महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी ठरवून केले होते आणि यामागे फडणवीस होते. हे मी विधानसभेत वारंवार सांगितले होते व ते आता स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पटाले यांनी दिली.

- Advertisement -

कॅटच्या ऑर्डरचे अवलोकन केले असता परमवीर सिंग यांना क्लीन चीट दिलेली नाही, तर शिंदे फडणवीस सरकारने जाणीवपूर्वक प्रकरण कमजोर करून परमवीर सिंग यांना तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे वाचविण्यासाठी मदत केली आहे, असे दिसून येते. परमवीर सिंग प्रकरणात शिंदे फडणवीस सरकारची गलिच्छ मानसिकता राज्याच्या जनतेसमोर आली आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारण कधीही एवढ्या खालच्या पातळीवर गेले नव्हते, ते घेऊन जाण्याचे आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे पाप शिंदे फडणवीसांनी केले आहे. हे परमवीर सिंहाच्या प्रकरणात स्पष्ट झाले असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -