ठाणे महापालिकेने मोठ्या थाटात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोव्हिड हॉस्पिटलचे उदघाटन केले. पण या हॉस्पिटलमध्ये इतका ढिसाळ कारभार चालतो की ऍडमिट केलेला पेशंट कुठे जातो, याची कोणतीही काळजी घेण्यात येत नाही. गेले चार दिवस कळव्याचे गायकवाड हे पेशंट हॉस्पिटल मधून गायब आहेत. ते कुठे गेले याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही.
ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या सचिव डॉ.चेतना दिक्षित याना जेव्हा गायकवाड यांच्या नातेवाईकांनी संपर्क केला तेव्हा त्या स्वतः हॉस्पिटल मध्ये गेल्या, हॉस्पिटल प्रशासनाने हे मान्य केले की ते ही गायकवाड यांचा शोध घेत आहेत, पण त्यांनी याबाबत कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केलेली नाही. या पेशंटची भरती झाल्याची नोंद आहे. त्याचे पुढे काय झाले? याचा कोणताही तपशील नाही. अभीयांनाच्या सचिव डॉ.चेतना दिक्षित, अनिल शाळीग्राम व रोहित जोशी आज हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नातेवाईक याना घेऊन गेले, त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी काल कापूरबावडी पोलीस स्टेशनला माहिती दिली असल्याचे सांगितले,पण चौकशी करता त्यांच्याकडे अशी कोणतीही माहिती नाही असे पोलिसांनी सांगितले.
या हॉस्पिटलबाबत अश्या तक्रारी अनेक आहेत. आठवड्यापूर्वी असेच एक वृद्ध आजोबा सापडत नव्हते, अधिक खोलात जाऊन कार्यकर्त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना एकट्याला वेगळ्या रूम मध्ये ठेवल्याचे कळले, पण किमान ३० ते ३५ तास हे आजोबा व त्यांचे नातेवाईक यांचा संपर्क नव्हता. अश्याच एक पेशंट श्रीमतीं खान याना इथे भरती केले होते. त्यांचाही मागमूस लागत नाही. हे ग्लोबल नावाचे हॉस्पिटल असून त्यातील कारभार हा अत्यन्त ढिसाळ व कोणतीही सुरक्षा देणारा नाही.
ठाणे मतदाता जागरण अभियानच्या डॉ.चेतना दिक्षित, अनिल शाळीग्राम व रोहित जोशी यांनी काही मागण्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे
१) गायकवाड गायब झाल्याची पूर्ण जबाबदारी हॉस्पिटल प्रशासनाची व महापालिकेची असून याबाबत जे जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करावी.
२) गायकवाड यांच्या नातेवाईकांना खरी व योग्य माहिती द्यावी..गायकवाड यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी हॉस्पिटल प्रशासनावर व त्यांच्या प्रमुखांवर राहील.
३) हॉस्पिटल मध्ये दाखल करताना व घरी जाताना व्यवस्थित नोंद केली जात नाही, या काळात पेशंटच्या नातेवाईकांना दिवसातून एकदा सर्व माहिती व फोनरून संपर्क करू दिला पाहिजे, हॉस्पिटल कडून त्यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली जावी.
४) आज दाखल असलेल्या सर्व पेशंटची नावे व पत्ता रिसेप्शन मध्ये डिस्प्ले करावा, ज्यांना डिस्चार्ज दिला वा त्यांचा मृत्यू झाला ही सर्व माहिती नावानिशी बाहेर लावणे जरुरीचे आहे.
५) अधिक सुरक्षा रक्षक नेमावे, व रिस्पेशन परिसरात सि. सी. टीव्ही लावून त्याचे रेकॉर्ड सेव्ह करावे
६) श्रीमती खान यांचे काय झाले? हे जाहीर करावे.
७) आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी
हे ही वाचा – ८ जुलैपासून राज्यातील हॉटेल्स सुरू करण्यास सरकारची परवानगी पण…