राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील जनतेच्या मतप्रवाहाहाबद्दल मोठे विधान केले आहे. केंद्र सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेऊनही लोक वेगळी भूमिका का घेत नाही? त्याची तुलना का करत नाहीत?, असा प्रश्न उपस्थित करत लोकांना नरेंद्र मोदी यांना पर्याय हवा आहे, असे मत पवार यांनी मांडले आहे.एका मुलाखतीत ते बोलत होते.
मोदी त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्याचबरोबर सरकारमध्येही ते सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांची विचारसरणी वेगळी आहे, त्यामुळे आम्ही ती त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. त्यावरून आम्ही त्यांच्या टीकासुद्धा करतो. पण, अनेक लोकहितासाठी मारक निर्णय घेतल्यानंतरही लोक वेगळी भूमिका घेऊन त्यांची तुलना का करत नाही? कारण लोकांना पर्याय अपेक्षित आहे. आम्ही पर्याय देऊ शकतो, असा आत्मविश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यात कुणाला यश मिळाले आहे का?, असा सवाल करत पवारांनी विरोधी पक्षाच्या कमकुवतपणा बोट ठेवले.
मी हे मान्य करतो की, आम्ही सर्व विरोधक यासाठी जबाबदार आहोत. जोपर्यंत कुणीतरी जनतेच्या मनात हा आत्मविश्वास निर्माण करत नाही की सरकार चुकीचे आहे आणि त्याला आम्ही उत्तर देवू शकतो,तो पर्यंत बदल घडत नाही,असे पवार म्हणाले. मी असे केलं आहे आणि त्यानंतर मिळणारा लोकांचा पाठिंबा मी अनुभवला आहे. लोक देशाविषयी विचार करतात, असेही पवार यावेळी म्हणाले.
कांद्याच्या दरवाढीविषयीही दिला होता इशारा
तीन ते चार महिन्यांपूर्वी शेतकर्यांनी कांदा रस्त्यावर फेकला. पण, केंद्र सरकारने त्यावेळी चांगला भाव कांद्याला दिला नाही. यामुळे पुढच्या हंगामात कांदा उत्पादक शेतकरी दुसर्या पिकांकडे वळला. आता आपल्याला तुर्कीतून कांदा आयात करावा लागत आहे. कांदा आयात करून केंद्र सरकारने नक्कीच चूक केली आहे. या सगळ्यांविषयी मी तीन महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. त्यात हे असे घडेल, असा इशारा दिला होता, असे पवार यांनी मुलाखतीत सांगितले.