पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड हे आज पत्नीसह पोहरादेवी गडावर पोहचले आहेत. यावेळी राठोड यांच्या समर्थकांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. यावरुन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी निशाणा साधला आहे. आरोपी मंत्र्याचे मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करणे हे लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. असे म्हणत दरेकर यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दरेकर यांनी हे वक्तव्य केले.
राठोड आज पोहरादेवी गडावर काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यावर प्रतिक्रिया देताना दरेकर यांनी आपले मत मांडले. ‘महाराष्ट्राच्या इतिहासात बेशरमपणा, निर्लज्जपणा पाहिलेला नाही. वनमंत्री संजय राठोड निर्दोष असतील तर त्यांनी आधीच या प्रकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करायला हवी होती. ज्यावेळी प्रसारमध्यमांमध्ये पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गदारोळ होतो, आणि त्या प्रकरणात एखाद्या मंत्र्याचे नाव येते तेव्हा त्या मंत्र्याने समोर येऊन आपली भूमिका मांडायला हवी असे म्हणत दरेकर यांनी राठोड यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले.
हेही वाचा : संजय राठोड पोहरादेवीला येणार, मंदिराच्या परिसरात फौजफाटा तैनात
मंत्र्यांच्या भूमिकेनंतर पक्षप्रमुखाने आपल्या पक्षातील मंत्र्याबाबत भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. गृहमंत्री आणि पोलीस प्रशासन काय करत आहेत तसेच या प्रकरणाची वस्तुस्थिती काय आहे, हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे. असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांच्या बैठका झाल्या, मंत्रीमंडळाच्या बैठका झाल्या, कॅबिनेट बैठका झाल्या, विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा वेळी पालकमंत्री म्हणून वनमंत्री संजय राठोड यांनी जनतेसमोर यायला हवे होते. तसेच अनेक बैठकांना मंत्री संजय राठोड उपस्थित राहिले नाहीत असेही दरेकर यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुढे म्हटले आहे की, इतके दिवस वनमंत्री संजय राठोड नियोजन करत होते का? प्रकरणाचा फासा पलटवण्याचा प्रयत्न करत होते का? ज्याला कर नाही त्याला डर असायचे कारण नाही. परंतु मंत्र्यांचे वागणे पाहिले तर संशय बळावत असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: महाविकास आघाडीचे निर्बंध म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान’, महाजनांचे टीकास्त्र
बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेला हयात होते. तेव्हा शिवसेना नेते शशिकांत सुतार आणि इतर नेत्यांवर अण्णा हजारेंनी आरोप केले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी तडकाफडकी राजीनामे घेतले होते. आता त्याच बाळासाहेबाचे सुपुत्र आज राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि निर्दोष सिद्ध झाले तर मंत्रीमंडळा घ्या असा सल्ला दरेकरांनी दिला. सत्ता टीकवण्यासाठी आणि सत्तेच्या बळावर हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.