आमच्या मुलांच्या किडनी काढून न्याल तुम्ही, नको आमच्या मुलांना तुमच्या शाळेत टाकायला, अशा प्रकारची मानसिकता अनेक पालकांकडून सुरूवातीच्या काळात समोर आली. अनेकांनी आम्हाला दारात उभे करण्यासाठीही टाळाटाळ केली. अशा प्रकारच्या नकारात्मक आणि अपमानास्पद वागणुकीनंतरही आम्ही आमचे शिक्षणाचे काम थांबवले नाही. आतापर्यंत शाळेतून १५० हून अधिक मुले शिकून बाहेर पडली आहेत, हे सांगताना प्रतिभा इरकशेट्टी यांचा आत्मविश्वास काही औरच होता. इरकशेट्टी यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. पण हा सगळा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. कारण शाळाच मुळाच गतिमंद मुलांसाठीची होती आणि तीदेखील ठाण्यातील मुरबाडसारख्या आदिवासी भागातील.प्रतिभा इरकशेट्टी यांनी अवनी शाळेच्या माध्यमातून आता गतिमंद मुलांना एक आत्मविश्वासाचे असे घरकुल मिळवून दिले आहे.
शाळा सुरू होऊन आता दहा वर्षे झाली आहे. पण आता शाळेच्या मदतीला मदतीला अनेक हात सोबत आले आहेत, त्याच कारण म्हणजे आता शाळेबाबतची वाढलेली आत्मियता. आता समाज म्हणून गतिमंद मुलांच्या शिक्षणासाठीही पालकांचा आत्मविश्वास वाढू लागला आहे असे इरकशेट्टी सांगतात. नुसती शाळकरी गतिमंद मुलेच नाहीत तर मोठ्या वयांच्या माणसांनाही या शाळेचा आधार वाटू लागला आहे. शाळेतील मुलांच्या मदतीसाठी आता दहा जणांचा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. शिवाय शाळेत चार शिक्षकही आहेत. एरव्ही घरी ज्या सवयी किंवा शिस्त अशा गतिमंद मुलांच्या पालकांना लावणे शक्य नसते, तशा गोष्टी या शाळांमध्ये करणे शक्य होते,असेही त्या सांगतात.
माझी बहिण गतिमंद होती. शाळा काढण्याचे मुख्य कारण तेच होते. पण पालकांच्या अशिक्षितपणामुळे त्यांना बहिणीसाठी काही विशेष करता आले नाही. आपल्या समाज जीवनात अनेक लोकपयोगी गोष्टी केल्यानंतर अशा गतिमंद मुलांसाठी शाळा काढावी अस मी मनाशी निश्चित केले आणि शाळेला सुरूवात झाली. सुरूवातीच्या काळात अनेक आव्हाने ही शाळेतील मुलांना जमवण्यापासून ते शाळेची इमारत उभी करण्यापर्यंत होती. पण प्रत्येक आव्हानावर आम्ही मात करत आज दहाव्या वर्षातही शाळेचा डोलारा सांभाळला आहे. अनेक जणांचे हात शाळेसाठी लागले आहेत. त्यामध्ये शाळेसाठी जमीन उपलब्ध करून देणार्या ग्रामपंचायतीपासून ते सेवाभावी मदत करणारे अनेक लोक आहेत,असे म्हणत इरकशेट्टी दात्यांचा आभारही मानतात.