मुंबईत थैमान घालणारा कोरोना अद्याप गेलेला नाही. गेल्या मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने भायखळा येथील राणीची बाग बंद करण्यात आली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने पालिकेने राणीची बाग सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोनाबाबतच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पर्यटकांना मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि हात स्वच्छ धुणे आदी नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसेच, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, ५ वर्षांखालील मुले यांनी शक्यतो भेट देणे टाळावे, असे आवाहन राणी बाग प्रशासनाने केले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, मुख्य प्रवेशद्वाराजवळील प्राणपक्षांची प्रदर्शनी विशेष काळजी म्हणून तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या राणीच्या बागेचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याने ५ वर्षांवरील बच्चे कंपनी, तरुण, तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींना १५ फेब्रुवारीपासून मनोरंजनाचे साधन खुले होणार आहे.
कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक
- कोरोना विषाणूचा संसर्ग मुंबईत पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे, असे असले तरी वेगवेगळ्या नागरी सेवा-सुविधा पुरवताना अद्यापही खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण या विषाणूचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
- राणी बाग उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात प्रवेश करताना मास्कचा वापर अनिवार्य असेल.
- वाहनधारकांनी प्रवेशद्वाराजवळ वाहनांची चाके निर्जंतुकीकरण फवारणी करूनच प्राणिसंग्रहालयात प्रवेश करावा.
- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि ५ वर्षांखालील लहान मुलांनी शक्यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे अथवा विशेष काळजी घ्यावी.
हेही वाचा – सत्तेसाठी ढोंग आणि सोंग करणारे नरेंद्र मोदी हे ‘ढोंगीजीवी’ – नाना पटोले