राज्याच्या विविध भागात काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने त्याचा विपरित परिणाम भाज्यांच्या पिकांवर झाला आहे. शेतात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी पिके खराब झाल्याने भाज्यांची आवक घातल्याने त्याचा विपरीत परिणाम भाज्यांच्या दरावर झाला. भाज्यांच्या दरात होत असलेल्या चढउतारामुळे ग्राहक मात्र हैराण झाले आहेत. पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात बसल्याने भाज्यांच्या दरांमध्ये वाढ होत चालली आहे, अशी प्रतिक्रिया एपीएमसीतील भाजी मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी आपलं महानगरशी बोलताना व्यक्त केली आहे.
वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये फ्लॉवरने १८ रुपयांवरून थेट ३६ रुपये किलोचा दर गाठला आहे. त्यामुळे फ्लॉवर खावा कि नाही , असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. गेल्या महिनाभरापासून १८ ते २० रुपये किलोच्या दरम्यान असलेली कोबी मात्र ग्राहकांच्या खरेदीच्या आवाक्यात आहे.
कोरोनाचे लॉकडाऊन संपून मिशन बिगेन अगेन सुरू झाल्यानंतर एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढली आहे. आवक बरोबर ग्राहकांची संख्याही वाढल्यामुळे भाज्यांचे दर तेजीत आले आहेत. महिनाभरापासून मार्केटमध्ये भाज्यांच्या दरांचा चढउताराचा खेळ सूरू आहे. पंधरवाड्यापुर्वी ठोक मार्केटमध्ये टोमॅटो ५० रुपये किलो विकला जात होता, आता त्याचा दर थेट ३५ रुपयांवर आला आहे. वांगी दोन आठवड्यांपुर्वी २० रुपये किलो या दराने मिळत होती आता त्यांच्यासाठी ३० रुपये मोजावी लागत आहेत. वाटाण्याने मात्र १२० रुपयांवरून १६० रुपयांवर उडी मारली आहे.