घरमुंबईशिंदेंच्या ‘जमालगोटा’ वक्तव्याला जनताच उत्तर देईल, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना रोखठोक सुनावले

शिंदेंच्या ‘जमालगोटा’ वक्तव्याला जनताच उत्तर देईल, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना रोखठोक सुनावले

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत आज (28 मे) नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातून लोकशाहीचे प्रमुख असलेले राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना आमंत्रित न करण्यात आल्याने या ऐतिहासिक सोहळ्यावर देशातील 21 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. या कार्यक्रमामुळे विरोधकांना पोटदुखी झाली आहे, त्यांच्या पोटदुखीवर जनता जमालगोटा देईल, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षावर टीका करताना केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. (Ajit Pawar reprimands Public will answer to Shinde’s ‘Jamalgota’ statement)

एकनाथ शिंदेच्या विधानावर पत्रकारांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी यशवंतराव चव्हाणांची (Yashwantrao Chavan) आठवण करुन दिली. एकनाथ शिंदेंनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. मात्र यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा सुसंकृत महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी, बाकीच्या मान्यवरांनी कसं बोलायचं असतं याचे काही संस्कार आपल्यावर केले होते. परंतु जमालगोटा वगैरे शब्द मुख्यमंत्र्यांना तरी पटतात का? असा प्रश्न अजित पवार यांनी केला.

- Advertisement -

आपण लोकशाही मानणारे आहोत
एकनाथ शिंदे म्हणातात ना जनता सांगेल वगैरे, मग जनता सांगेलच. जनतेने कर्नाटकात सांगितले आहे पुढेही जनता सांगेल. आपण लोकशाही मानणारे आहोत. उद्या जनतेला ज्यांना केंद्रात पाठवायचे त्यांना ते तिथे पाठवतील. राज्यात ज्यांना पाठवायचे आहे, त्यांना राज्यात पाठवतील. जनता ठरवेल खरंच महागाई कमी झाली का, बेरोजगारी कमी झाली का? लोकांचे प्रश्न सुटले का? असा टोमनाही अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?
नवीन संसद भवनावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, 2019 मध्ये सुरुवात झाली आणि 2023 मध्ये या वास्तूचे लोकापर्ण होत आहे. नवीन संसद भवन अतिशय रेकॉर्ड वेळेत पूर्ण झाले आहे. ही संपूर्ण देश आणि जनतेसाठी अभिमानाची बाब आहे. हे लोकशाहीचे पवित्र मंदिर असल्यामुळे संसदेच्या लोकार्पण प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे. परंतु काही लोकांकडून विरोध केला जात आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे. त्यामुळे विरोधक नेमकं लोकशाहीला विरोध करत आहेत का मोदींना? हे त्यांनी सांगावे. विरोधकांना जी पोटदुखी सुटली असेल तर जनता सुज्ञ आहे. जनता त्यांच्या पोटदुखीला चांगला जमाल गोटा देऊन त्यांची पोटदुखी दूर करेल आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -