वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यात मिनी लॉकडाऊन करण्यात आले. यामध्ये सकाळची जमावबंदी तर सायंकाळी ८ नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक पक्षांच्या नेत्यांशी झूमद्वारे चर्चा केली. यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील चर्चा केली. या चर्चेनंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्यात झालेल्या चर्चेबाबत जनतेला सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तक्रारी नाही तर काही महत्त्वाच्या सूचना केल्याचे सांगितले आहे. या आठ महत्त्वाच्या सूचनांमध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत होणाऱ्या गोंधळाबाब एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची सूचना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली. याव्यतिरिक्त त्यांनी अजून कोणत्या सूचना केल्यात पाहुया.
२ ते ३ दिवस दुकानांना विक्रीची परवानगी द्यावी
छोट्या उद्योगांनी त्यांचं उत्पादन चालू ठेवावे पण, त्याची विक्री होऊ नये, असं सरकारचं म्हणणं आहे. पण, मुळात जर विक्री होणार नसेल तर उत्पादन का करायचं? त्यामुळे आठवड्यात किमान २ ते ३ दिवस दुकानांना विक्रीची परवानगी द्यावी.
वसुलीसंदर्भात बँकांशी सरकारने चर्चा करावी
बँकाकडून थकीत कर्जाच्या बाबतीत कर्जदारांकडे जो तगादा सुरु आहे त्यामुळे कर्जदार त्रस्त आहेत. कारण मुळात उद्योग बंद आहेत. नोकऱ्या गेल्या आहेत अशा वेळेस जो तगादा सुरु आहे, तो थांबायला हवा. या सक्तीच्या वसुलीसंदर्भात बँकांशी सरकारने चर्चा करायला हवी.
वीजबिलं माफ करावे
लॉकडाऊनच्या काळात वीजबिलं माफी द्यायला हवी कारण मुळात उत्पादन सुरु नाही. ऑफिस बंद आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशा परिस्थितीत लोकांनी भरमसाठ वीजबिलं कशी भरायची?
कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करा
कंत्राटी कामगारांना काढायचं पुन्हा कोरोना वाढला कि घ्यायचं यापेक्षा सरकारने महापालिकांमध्ये कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घ्यायला हवं.
मनोरंजन, जिम, आणि सलून यांच्याबाबत सूचना
मनोरंजन, सलून आणि जिम यांना देखील आठवड्यातून दोन वेळा परवानगी देण्यात यावी. विशेष म्हणजे गर्दी न होऊ देता जिममध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्यायला हवी.
खेळाबाबत महत्त्वाची सूचना
खेळाडूंना सरावासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी
शेतीबाबत सूचना
सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव द्यायला हवा. कारण शेतकरी कोसळला तर राज्यावर पुन्हा एकदा मोठ संकट येऊ शकत.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करावे
शाळा बंद आहेत. तसेच शिक्षण ऑनलाईन पण फी कायम, असं का? शाळांची फी निम्मी करावी. तसेच १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी सरसकट पास करावे.
हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या हाती राज्य आलंय की, उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय, राज ठाकरेंचा टोला