देशात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. सध्या देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. लॉकडाऊनच्या या काळात लांबच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रद्द झालेल्या गाड्यांच्या तिकीटाचे पैसे आजपासून म्हणजेच २६ मेपासून मिळणार आहेत. यासाठी काही निवडक स्थानकावर तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊनमध्ये २२ मार्च ते ३० जून दरम्यान एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट आरक्षीत केलेल्या प्रवाशांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले आहेत. पण ज्या प्रवाशांनी खिडकीवरून काढलेल्या तिकीटाचे पैसे त्यांना तिकीट खिडकीवरच मिळणार आहेत. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे चार, लोकमान्य टिळक टर्मिनसवर तीन, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल स्थानकात प्रत्येकी दोन खिडक्या आणि बदलापूर स्थानकात एक येथे तिकीट खिडकी सुरू करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वसई रोड, वलसाड, सुरत आणि नंदुरबार स्थानकांत प्रत्येकी दोन तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत, तर २७ मेपासून अंधेरी, बोरिवली आणि वापी येथेही तिकीट खिडकी सुरू करण्यात येणार आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन महत्त्वाचे
यावेळी नागरिकांना स्थानकात सामाजिक अंतराचे पालनही करावे लागणार आहे. लॉकडाऊनचे नियम पाळूनच तिकीटाचा परतावा लोकांना मिळणार आहे.
प्रवासाची तारीख आणि तिकिटाचा परतावा
२२ ते ३१ मार्च- २७ मेपासून तिकिटाचा परतावा
१ ते १४ एप्रिल- ३ जूनच्या पुढे
१५ ते ३० एप्रिल- ७ जूनच्या पुढे
१ ते १५ मे- १४ जूनच्या पुढे
१६ ते ३१ मे- २१ जूनच्या पुढे
१ ते ३० जून- २८ जूनपासून
हे ही वाचा – करण जोहर कुटुंबाबरोबर क्वारंटाईन, घरातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण!