मलिष्का आणि मुंबई महानगर पालिका हे नातं फार जुनं आहे. पावसाळ्यात खड्ड्यात जाणाऱ्या मुंबईवर आरजे मलिष्कानं सोनू तुला बीएमसीवर भरवसा नाही का? या गाण्याच्या चालीवर गाणं बनवलं होतं. त्यानंतर सैराटच्या चालीवर देखील एक गाणं २०१७मध्ये तिनं बनवलं होतं. त्यानंतर पालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती. आता पुन्हा तसं काही घडू नये म्हणून पालिका आधीच सेफ्टी मोडवर आली आहे. मुंबई पालिकेचे नवनियुक्त आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मलिष्काविषयीचा आधीचा अनुभव पाहाता तिला बोलवून मुंबईतल्या पम्पिंग स्टेशनवर नक्की कसं काम चालतं आणि काय समस्या येतात, हे दाखवलं आहे.
पालिकेवर भरवसा ठेवावाच लागेल!
खुद्द महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी पालिकेतील इतर अधिकाऱ्यांसोबत मलिष्काला घेऊन वरळीतल्या लव्ह ग्रोव्ह पम्पिंग स्टेशनला भेट दिली. यावेली तिथल्या कामाची माहिती त्यांनी मलिष्काला दिली. त्याशिवाय पालिकेच्या मुख्यालयात मलिष्काला नेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागाचं काम कसं चालतं, याचीही माहिती त्यांनी मलिष्काला दिली. त्यामुळे यंदा पुन्हा पावसाळ्यात मलिष्काने गाणं किंवा तसं काही करून पालिकेवर निशाणा साधू नये, तुम्हाला पालिकेवर भरवसा ठेवावाच लागेल असं सांगण्यासाठीच पालिकेकडून हा खटाटोप करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे खुद्द पालिका आयुक्तांनी एखाद्या पत्रकाराला, त्यातही रेडिओच्या जॉकीला बोलवून माहिती दिल्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी. यावेळी पावसाळयाच्या दिवसांत पाणी उपसा करणाऱ्या सहा उदंचन केंद्रांपैकी पाच उदंचन केंद्र कार्यान्वित करण्यात आलेली असून उर्वरित एक केंद्रही या पावसाळयात सुरु केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच चमडावाडी नाल्यालगत असलेली अनधिकृत बांधकामे पूर्णपणे काढून टाकण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे यावेळी पाणी भरणाऱ्या ठिकाणांची संख्या कमी राहणार असून यावर्षी रस्त्यांची कामे चांगली झाली असल्याने रस्त्यांवरसुध्दा कमी प्रमाणात खड्डे कमी पडतील, असा दावाही आयुक्तांनी केला.
Hmmmmmm 🙂 #whathappensnext ? https://t.co/x4ziziuWzg
— Mumbai Ki Rani (@mymalishka) June 20, 2019
यावर्षी २०० कि.मी.लांबीचे रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून खड्डे भरण्यासाठी कोल्ड मिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. महापालिकेच्या ७ तलांवामधून मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येत असून सध्यस्थितीत तलावक्षेत्रात पाऊस नसल्या्ने जलसाठा जुलैअखेरपर्यंत पुरविण्याचे नियोजन आहे. मुंबईतील घनकचरा, रस्ते, आरोग्य विषयक सुविधा, पाणीपुरवठा, नाल्यांची सफाई या महत्वपूर्ण विषयांबाबत महापालिका प्रशासन अत्यंत निष्ठापूर्वक कामे करित असून प्रसारमाध्यमे, सोशल मिडिया यांनी ही कामे मुंबईकरांपर्यंत पोहचवावीत, असे आवाहनही महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी केले आहे.