आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने एनसीबी मुंबई झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर २५ कोटींची खंडणी मागितल्याचे आरोप केल्यानंतर या आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी वानखेडे यांची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. समीर वानखेडे यांची एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी झाल्याने वानखेडे यांना ड्रग्ज प्रकरणातील तपासावरुन हटवणार का असा प्रश्न समोर आला. यावर उत्तर देत एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या आोपांवर जोवर कोणतेही ठोस पुरावे मिळणार नाही तोपर्यंत समीर वानखेडेच ड्रग्ज प्रकरणातील तपास अधिकारी राहतील असे स्पष्ट केले आहे. वानखेडे यांच्या चौकशीसाठी दिल्लीहून ५ विशेष अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत दाखल झाले होते. यावेळी समीर वानखेडे यांची या प्रकरणी जबाब नोंदवून घेतला. यावेळी समीर वानखेडे यांनी काही कागदपत्र देखील ज्ञानेश्वर सिंह यांना दिली.
प्रभाकर साईल याने समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या या आरोपांची तपासणी करण्यासाठी एनसीबीच्या पाच सदस्यांची निवड करण्यात आली असून या प्रकरणातील चौकशी दरम्यान प्रत्यक्ष साक्षीदारांना देखील बोलावण्यात येणार आहे. एनसीबीच्या विशेष अधिकाऱ्याची टीम सध्या मुंबईत असून गरज पडल्यास ते समीर वानखेडे यांच्याकडे काही कागपत्रे किंवा पुरावे मागतील असे सांगितले आहे.
ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने या प्रकरणात २५ करोड रुपयांचे डिल झाले होते आणि त्यातील ८ करोड रुपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार असल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र प्रभाकर साईल याने केलेले सर्व आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळले आहेत. या प्रकरणी आज समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली असून प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांची चौकशी होणे अद्याप बाकी आहे. या दोघांनाही चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी दिले आहेत.
हेही वाचा – Drug Case :आर्यनच्या जामीन अर्जावर आता गुरूवारी सुनावणी, तुरूंगातील मुक्काम वाढला