‘भाजपशी युती करुन शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे’, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली आहे. सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे युती संबंधात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर युतीची घोषणा करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना २३ आणि भाजप २५ जागांवर निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, या युतीची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. त्याचबरोबर संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंच्या विरोधात ४२० चा गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.
शिवसैनिकांनी उद्धव साहेबांवर 420 चा गुन्हा दाखल करायला हरकत नाही तो न्यायालयात सुद्दा टिकेल अस मला मूळचा शिवसैनिक असलेला वकील सांगत होता
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 19, 2019
नेमकं काय म्हणाले संदीप देशपांडे?
आपलं महानगरशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, ‘मला शिवाजी पार्क येथे एक वकील भेटलेले जे मुळचे शिवसेनेचे आहेत. ते म्हणाले की, शिवसेनेने अशाप्रकारे आमची फसवणूक केली आहे.ज्या पद्धतीने आमची फसवणूक झाली आहे, त्यापद्धतीने आम्ही गुन्हे दाखल करायला पाहीजे की तुम्हा आमची फसवणूक केली. मला असं वाटतं खरोखरच ज्या पद्धतीने शिवसेनेन भाषणं केली, वातवरण निर्मिती केली, चौैकीदार चोर है अशी टीका केलेली आणि आता गळ्यागळे घातले आहे. ही निश्चितच फसवणूक आहे. ही फक्त शिवसैनिकांचीच फसवणूक नाही. तर, संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसले आहे.’