महाविकासआघाडी सरकारकडून विधान परिषदेवर पाठवण्यासाठीच्या १२ नावांची यादी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवण्यात आली आहे. मात्र, राज्यपाल आणि महाविकासआघाडी सरकारमधले संबंध किती तणावपूर्ण राहिले आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल ही यादी स्वीकारणार की नाकारणार? यावर मोठी चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्य सरकारने राज्यपालांना यादी सादर केली आहे. राज्यपाल सूज्ञ आहेत. ते कोणताही राजकीय बखेडा या निमित्ताने करणार नाहीत’, असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे आता राज्यपाल यावर काय भूमिका घेतात, हा चर्चेचा विषय ठरला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
विधानपरिषद सदस्यांच्या यादीविषयी विचारणा केली असता संजय राऊत म्हणाले, ‘राज्यपाल कोणताही राजकीय बखेडा या निमित्ताने करणार नाहीत. राज्यपाल सूज्ञ आहेत. राज्यपालांवर आमचं प्रेम आहे. राज्यपालांचंही शिवसेनेवर प्रेम आहे. आणि ते किती प्रेम आहे हे आख्ख्या देशाला माहिती आहे. या प्रेमातूनच सगळा कारभार सुरू आहे’.
दरम्यान, २०१९मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी दिली गेली, यावरून बऱ्याच चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, संजय राऊत यांनी त्याचं समर्थन केलं आहे. ‘उर्मिला मातोंडकर यांच्यासारखी देश आणि राज्याच्या प्रश्नांवर जाण असलेली अभिनेत्री विधानपरिषदेत गेली, तर त्यातून महाराष्ट्राला फायदाच होईल’, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा – विधानपरिषदेसाठी सरकारने सुचवलेली नावं राज्यपाल नाकारू शकतात का? कायदा काय सांगतो? वाचा!
मविआकडून पाठवण्यात आलेली १२ नावं
शिवसेना
उर्मिला मातोंडकर
चंद्रकांत रघुवंशी
विजय करंजकर
नितीन बानगुडे पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस
एकनाथ खडसे
राजू शेट्टी
यशपाल भिंगे
आनंद शिंदे
काँग्रेस
रजनी पाटील
सचिन सावंत
मुझफ्फर हुसेन
अनिरुद्ध वनकर