राज्यसभेची निवडणूक आमच्यावर लादण्यात आली आहे, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी केला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडणून येतील. या निवडणुकीत अजिबात घोडेबाजार होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक वर्षा बंगल्यावर आयोजित केली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि अन्य उपस्थित होते.
या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले आम्ही ही निवडणूक स्वीकारली आहे. आमचे बळ दाखवण्याची आम्हाला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. वास्तविक आम्हाला बळ दाखवायचे नव्हते. पण विरोधकांनी ही निवडणूक आमच्यावर लादली. याचा त्यांना पश्चात्ताप होईल. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील. कोणीही शहाणपणा करू नये. केंद्रीय यंत्रणा दबाव टाकण्याचा प्रयत्न करते पण आम्हीच जिंकणार, असे संजय राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील. कोणीही शहाणपणा करु नये तसेच निवडणुकीमध्ये घोडेबाजार होणार नाही. त्यांचे घोडे त्यांचा बाजार आम्हाला बाजारात उभं राहण्याची गरज नाही असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेचे उमेदवार संजय पवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्याकडे बहुमताचा आकडा आहे. आम्ही घोडेबाजार करणार नसून ज्याला पाहिजे त्याने घोडेबाजार करावा, आम्हाला बाजारात बोलायची गरज नाही. काहीपण करा शेवटी आमचाच विजय होणार आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सहावी जागा भाजपचा उमेदवार जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार झाली आहे.
हेही वाचा : निर्बंध नको असतील, तर शिस्त पाळा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन