शिवसेनेची भूमिका ही परप्रांतीयांच्या निमित्ताने अनेक वेळा समोर आलेली आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतर त्यांची जी भूमिका आहे आणि सेनेकडून हे सगळे का केले जात आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. म्हणूनच उद्या ते मुस्लिम समाजाचा मेळावाही घडवून आणू शकतात असा टोला केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला लगावला. शिवसेनेकडून मुंबईत गुजराती समाजाच्या मेळावा भरवण्याच्या मुद्दयावर त्यांनी ही टीका केली. शिवसेनेवर टीका करतानाच त्यांनी महाविकास आघाडीलाही लक्ष केले.
“शिवसेनची परप्रांतीयांबद्दलची भूमिका अनेक वेळा समोर आली आहे.सत्तेत आल्यावर त्यांची जी भूमिका आहे,ते हे सगळ का करत आहेत,हे सगळ्यांनाच माहीत आहे.उद्या ते मुस्लिम समाजाचा ही मेळावा घडवून आणू शकतात.त्यांची भूमिका सतत बदलतच असते.अन्य पक्षांसोबत राहिल्याचा परिणाम आहे.”
– @raosahebdanve pic.twitter.com/KhCcoe6TFE— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 5, 2021
शिवसेनेची भूमिका ही सतत बदलत असते असे बोलतानाच दानवे म्हणाले की, अन्य पक्षांसोबत राहण्याचे हे परिणाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही एकप्रकारे टोला लगावत त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनाही या निमित्ताने टार्गेट केले. शिवसेनेने जेव्हापासून गुजराती मतदारांसाठी मेळावा भरवण्याचे जाहीर केले आहे, तेव्हापासूनच भाजपमधील अनेक नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. त्यामध्ये भाजपचे नेते आणि प्रवक्ते अतुळ भातखळकर यांनीही शिवसेनेच्या भूमिकेवर टिका केली आहे. अजान स्पर्धा भरवणाऱी शिवसेना आता वेगवेगळ्या मतांसाठी भूमिक घेत आहे. त्याचाच भाग म्हणजे शिवसेनेचा गुजराती मेळावा आहे. त्यामुळेच मुंबईकर या शिवसेनेच्या घोषणेला भूलणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचा उल्लेख भातखळकर यांनी जनाब सेना असा केला होता. त्या विधानापाठोपाठच आता रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेच्या गुजराती मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणुका जवळ आल्या शिवसेनेला मराठी माणसाची आठवण येते, गुजराती, मारवाडी अशा अन्य प्रांतामधील मतदारांची आठवण येते. पण निवडणुका संपल्या की शिवसेना सर्वांनाच विसरते अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्त राम कदम यांनी दिली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही शिवसेनेने अशीच भूमिका अवलंबली. शिवसेनेला फक्त निवडणुकांमध्ये हिंदुत्व आठवले. ज्या कॉंग्रेसचा हिंदुत्वाला विरोध होता, त्याच कॉंग्रेससोबत आता शिवसेना सत्तेत आहे. निवडणुकांच्या वेळी सरड्यासारखे रंग बदलण्याची ही सवय संपुर्ण देश जाणतो अशा शब्दात त्यांनी शिवसेनेच्या गुजराती मेळ्यावाचा समाचार घेतला आहे.