घरमुंबईविरोधकांनो जपून बोला, शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजपवर टीकास्त्र

विरोधकांनो जपून बोला, शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजपवर टीकास्त्र

Subscribe

शहाण्यासुरत्यांनी भव्य स्वरूपात लग्न समारंभ केला

राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होत आहे. राज्य सरकारकडून कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे. एम्स सारख्या सर्वोच्च वैद्यकीय संस्थानी धोक्याची जाणीव करुन दिली आहे. परंतु विरोधकांकडून कोरोना संकटावरही राजकारण केले जात आहे. एम्स म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही आहे. विरोधकांनी कोरोना संकटात तरी जपून बोला, विरोधी पक्षाने कोरोना संकटाचा भान राखावे असा घणाघात शिवसेनेचे मुखपक्ष असलेल्या सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला आहे. राजकारण करण्यासाठी उभा जन्म पडला आहे. परंतु कोरोनाने संधी दिली तर त्यामुळे काळजी घ्या असे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात

राज्यात कोरोनाची दुसरी लाट धडक मारते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. राज्यात गेल्या २४ तासांत सात हजारांवर नवे रुग्ण झाले. मुंबई शहरातच हा आकडा हजाराच्या आसपास आहे. नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, वर्धा जिह्यांत कोरोना वेगाने पसरतो आहे. शेवटी मुख्यमंत्र्यांना समोर येऊन सगळय़ांनाच कडू औषधाचा डोस पाजावा लागला. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, लोकांनी शिस्त, नियम पाळावेत. राज्यात ‘लॉक डाऊन’ लावायचे की नाही, याचा निर्णय पुढील आठवडय़ात घेऊ. ”मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉक डाऊन टाळा”, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

- Advertisement -

दरेकरांच्या विधानाचा अर्थ फडणवीसांना समजला का?

निर्बंध सैल केल्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढते आहे. अशा प्रसंगी राजकारण न करता सरकार तसेच विरोधकांनी जनतेचे हित सांभाळावे, एकोप्याने काम करावे असे संकेत आहेत, पण मुख्यमंत्र्यांनी ‘लॉक डाऊन’बाबत इशारा देताच विरोधी पक्षनेते दरेकर यांनी वेगळेच टोकाचे विधान केले, ”राज्यात लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करू नका. जुलमी राजवटीसारखी कृती करू नका.” दरेकर यांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार वगैरे तज्ञ मंडळींना तरी समजला काय? कोरोना संसर्गाबाबत सत्यस्थिती समोर मांडणे याला काय दहशत पसरवणे म्हणायचे?

भाजप पुढाऱ्यांनी ‘एम्स’च्या दारात आंदोलन करावे

महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याची माहिती ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. या नव्या स्ट्रेनमुळे ‘हर्ड इम्युनिटी’ मिळवणे आणखी कठीण असल्याची भीती डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केली. यापूर्वी कोरोनाच्या अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा केरोनाचे संक्रमण होण्याचा धोका असल्याचे डॉ. गुलेरिया सांगत आहेत. कोरोनावरील लस ही नव्या स्ट्रेनविरोधात कुचकामी आहे हे जे डॉ. गुलेरिया तळमळीने सांगत आहेत, तो काय दहशत माजविण्याचा प्रकार आहे? ‘एम्स’चे संचालक देशाला गुमराह करीत आहेत, असे महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी दिल्लीत जाऊन ‘एम्स’च्या दारात जोरदार आंदोलन केले पाहिजे.

- Advertisement -

विरोधकांनी आर्थिक पॅकेजसाठी मदत करावी

देशाचे आरोग्यमंत्रीच काय, पंतप्रधान, राष्ट्रपतींचे उंबरठे झिजवून निषेधाची पत्रे दिली पाहिजेत. पण मुख्यमंत्री बोलत आहेत, लोकांना धोका समजावून सांगत आहेत म्हणून टीका करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी द्रोह करणे किंवा त्यांना कोरोनाच्या खाईत लोटण्यासारखे आहे. मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्याचे स्वागत विरोधकांनी का करू नये? जनता जेवढी सत्ताधारी पक्षाची असते तेवढी ती विरोधी पक्षांचीसुद्धा आहे. लॉक डाऊनमुळे लहान व्यापारी, नोकरदार वर्ग, हातावर पोट आहे अशांचे कंबरडे मोडणार हे नक्की. आर्थिक व्यवस्थाही कोसळणार आहेच. त्यासाठी मार्ग काढावा लागेल व केंद्राने त्याकामी मदत करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला या कामी केंद्राकडून एखादे विशेष आर्थिक पॅकेज मिळायला हवे. असे आर्थिक पॅकेज मिळावे म्हणून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनीही मोदी यांच्याकडे तगादा लावला तरी आमची हरकत नाही. राज्यातील विरोधी पक्ष हा काही पाकिस्तानी किंवा अफगाणी वंशाचा नाही. तो याच मातीतला आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा, देवेंद्र फडणवीस, दरेकर, आशिष शेलार वगैरे मंडळींनी दिल्लीतच ठाण मांडून बसावे व राज्याच्या वतीने एक-दोन हजार कोटींच्या पॅकेजसाठी लढत राहावे. राज्यातून देशाला जो मोठा महसूल मिळतो, त्यातला पुरेसा परतावा महाराष्ट्राला मिळाला तर विरोधी पक्षाला सरकारकडून जे करून घ्यायचे आहे, त्याचा मार्ग मोकळा होईल.

शहाण्यासुरत्यांनी भव्य स्वरूपात लग्न समारंभ केला

आज लॉकडाऊन किंवा कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडले आहे तसेच कंबरडे नोटाबंदी पर्वातही मोडलेच होते. त्या मोडकळीतून देश अद्यापि उभा राहिलेला नाही. कोरोना संकटात तर लोकांच्या जीविताचे रक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे विरोधी पक्ष काय बोलेल याची फिकीर न करता मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. नाशिक-पुण्यासारख्या शहरांत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रमुख देवळांनाही कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागत आहे. आंदोलने, मोर्चे काढू नयेत असे बजाविण्यात आले आहे. लोकल ट्रेन सुरू झाल्या. त्यात मास्क न घालता प्रवासी चढतात. मधल्या काळात शहाण्यासुरत्या लोकांनी भव्य स्वरूपात लग्न समारंभ केले. तेथेही शिस्त मोडण्यात आली. शिस्त मोडण्यात सर्वपक्षीय प्रमुख लोक होते. त्यामुळे जनतेला तरी काय आदेश द्यावेत? कोरोना कुणालाही सोडत नाही. त्यामुळेच त्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही गाठले. राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळांनाही कोरोनाने गाठले.

विरोधी पक्षांनीही जबाबदारीचे भान राखावे

‘एम्स’सारख्या सर्वोच्च वैद्यकीय संस्थांनी धोक्याची जाणीव करून दिली. ‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, हे महाराष्ट्रातील विरोधकांनी समजून घेतले पाहिजे. पुन्हा लॉक डाऊन टाळायचा असेल तर लोकांनी जबाबदारीने वागावे. विरोधी पक्षांनीही जबाबदारीचे भान राखावे. विरोधकांनो, निदान कोरोना संकटाबाबत तरी जरा जपून वागा, बोला. राजकारण करायला उभा जन्म पडला आहे, पण कोरोनाने संधी दिली तर त्यामुळे काळजी घ्या असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -