टीआरपी घोटाळ्याबाबत मुंबई पोलिस सातत्याने तपास करत आहेत, आणि त्यातूनच नवनवीन खुलासे समोर येत आहेत. यामध्ये रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांचं व्हॉट्सअप चॅट समोर आल्याने यामुळे अर्णब गोस्वामी अडचणीत सापडलेत. अर्णब गोस्वामी व्हॉट्सअप चॅट प्रकरणावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी लष्कराची गुपितं कशी उघड होतात, असा सवाल देखील उपस्थितीत केला आहे.
गोस्वामींचं कोर्ट मार्शल करणार का?
टीआरपी घोटाळयानंतर पत्रकार अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी प्रमुख पार्थ दासगुप्ता यांचं व्हॉट्सअप संभाषण व्हायरल झालं आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, अर्णब गोस्वामी यांच्यावर भारतीय जनता पक्षांच्या प्रमुखांनी बोलणं गरजेचं आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्कराची गुपितं, देशाविषयी महत्त्वाची माहिती असा पद्धतीने उघड होत असेल तर त्याच्या राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका आहे. इतर वेळी भाजप नेते देशातील सर्वच पक्षांबद्दल बोलत असतात. आता या प्रकरणावर त्यांनी बोलले पाहिजे, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच, अर्णव गोस्वामी यांचे चॅट बाहेर आले आहेत. त्यातून त्यांना पुलवामा आणि बालकोटवर हल्ला होणार असल्याचे आधीच माहीत असल्याचे दिसून येते. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे, त्यामुळे त्यांचे कोर्ट मार्शल झाले पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी आता याप्रकरणावर बोललं पाहिजे. याबाबत त्यांची मतं काय आहेत, याविषयी आमच्या ज्ञानात भर घातली पाहिजे, असा टोला राऊत यांनी लगावला.
पक्षाचा विस्तार होण्यासाठी निवडणुका लढणार
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी असे सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये आपण निवडणूक लढवण्यास समर्थ असू तर शिवसेनेच्या प्रमुख लोकांनी तिकडचा दौरा करावा. किती जागा लढू शकतो यावर निर्णय घेऊ. पश्चिम बंगालमध्ये कोणत्या पक्षाला मदत करायला किंवा कोणाला हरवायला जात नसून फक्त शिवसेना पक्षाचा विस्तार व्हावा, यासाठी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.