घरमुंबईप्लॅस्टर ममतांच्या पायाला अन चिंता भाजपला, शिवसेनेचे केंद्रावर टीकास्त्र

प्लॅस्टर ममतांच्या पायाला अन चिंता भाजपला, शिवसेनेचे केंद्रावर टीकास्त्र

Subscribe

ममतांची जखम त्यांच्या विरोधकांना जास्तच भारी पडणार

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची रुणधुमाळी सुरु आहे. भाजप आणि तृणमुल काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीत वर्चस्व मिळवण्यासाठी चांगलाच कलंगीतुरा रंगला आहे. मात्र गुरुवारी तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर टोळक्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. ममतांच्या पायाला दुखापत झाल्याने आता या हल्ल्याचे राजकारण करण्यात येत आहे. यावरुन शिवसेनेच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. प्लॅस्टर ममतांच्या पायाला पण चिंता मात्रा भाजपला लागली आहे असा खोचक टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. ममतांनी या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हल्ला जाणूनबुजून करण्यात आला आहे. तर लोकांची सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. या अपघाताची सी.बी.आय चौकशी करा अशी मागणी एका भाजप नेत्याने केली आहे.

काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात

नंदीग्राममध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. वाघीण जखमी होते तेव्हा ती अधिक आक्रमक आणि हिंसक होत असते. त्यामुळे ममतांची जखम त्यांच्या विरोधकांना जास्तच भारी पडणार आहे. ममता या नंदीग्राम येथून निवडणूक लढत आहेत. त्या नंदीग्राम येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्या. त्यानंतर प्रचाराच्या दरम्यान बिरुलिया येथे मंदिरासमोर त्यांच्या गाडय़ांचा ताफा थांबला. कारच्या बाहेर उतरून त्या देवाला नमस्कार करत असताना चार-पाच लोक अचानक धावत आले आणि त्यांनी गरज नसताना दरवाजा ढकलून ममतांना जखमी केले. ममता यांच्या पायास मोठी दुखापत झाली असून त्यांचा पाय प्लॅस्टरमध्ये आहे. हा अपघात नसून विरोधकांनी जाणूनबुजून केलेला हल्ला आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

ममतांच्या हल्ल्याची सीबीआय चौकशी करा

लोकांची सहानुभूती मिळविण्याचा हा प्रयत्न आहे. या अपघाताची सी.बी.आय. चौकशी करा, अशी मागणी भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केली. ममतांच्या पायाला इजा झाली हे बरोबर. त्यांच्या पायाला प्लॅस्टर पडले हेही खरेच. मात्र त्या प्लॅस्टरच्या सी.बी.आय. चौकशीची मागणी हा प. बंगाल निवडणुकीतील सगळय़ांत मोठा विनोद म्हणावा लागेल. प्लॅस्टर ममतांच्या पायाला, पण चिंता भाजपला. ममतांच्या पायास पडलेले प्लॅस्टर भाजपच्या किमान दहा-वीस जागा नक्कीच जखमी करू शकते. भारतीय जनता पक्षाने प. बंगालात सर्व शक्ती पणास लावली आहे. ममतांची कोंडी करण्याचा हरएक प्रयत्न सुरू आहे. ममतांचा पक्ष रोज फोडला जात आहे. तरीही ममतांचा प. बंगालातील जोर कायम आहे.

ममता बॅनर्जी या ‘जय श्रीराम’ म्हणत नाहीत

पश्चिम बंगालातील लढाई ही ममता विरुद्ध नरेंद्र मोदी अशी झाली आहे. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष प. बंगालात काय घडतेय याकडेच लागले आहे. भारतीय जनता पक्षाने प. बंगालात ‘माहोल’ गरम केला आहे व प्रत्येक निवडणूक ते असाच माहोल निर्माण करून जिंकत असतात. असाच माहोल निर्माण करून भाजपने प. बंगालातील लोकसभेच्या १८ जागा जिंकल्या. हे यश मानावेच लागेल. १८ लोकसभा मतदारसंघांमधील हे यश म्हणजे साधारण १२० विधानसभा जागांवर भाजपास चढाई मिळाली असे मानले तरी विधानसभेची लढाई वेगळी आहे. प. बंगाल निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचा मुद्दा काय? तर ममता बॅनर्जी या ‘जय श्रीराम’ म्हणत नाहीत. त्यांच्या राजवटीत ‘जय श्रीराम’ म्हणायला बंदी आहे. ममता त्यांची प्रतिमा हिंदूविरोधी बनवून भाजप प. बंगालात मते मागत आहे. यावर ममतांनी सांगितले, ”मी ब्राह्मण आहे. धर्माचं राजकारण करू नका. मला हिंदू धर्म शिकवू नका.” नंदीग्राममध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ममता रेया पाडा येथील १००० वर्षे जुन्या महारुद्र सिद्धनाथ मंदिरात गेल्या. तेथे पूजा केली. ‘जय श्रीराम’ला ममतांचा विरोध आहे, असा प्रचार करणाऱ्यांना उत्तर म्हणून ममता बॅनर्जी यांनी जाहीरसभेत ‘चंडी पाठ’ म्हणून दाखवले. प. बंगालची निवडणूक अशा धार्मिक आणि व्यक्तिगत पातळीवर नेऊन ठेवण्याचे श्रेय भारतीय जनता पक्षाला द्यावेच लागेल. प. बंगालसारख्या मोठय़ा राज्याची निवडणूक जय श्रीराम, चंडी पाठ, ममतांच्या पायाचे प्लॅस्टर याभोवतीच फिरत आहे. हे आपल्या लोकशाहीचे विद्रुपीकरण आहे.

- Advertisement -

भारतीय जनता पक्षाला तोडीस तोड उत्तर

ममतांच्या पायास जखम झाली. आता त्याच अवस्थेत लंगडत किंवा हातात कुबडय़ा घेऊन कार्यकर्त्यांच्या आधाराने ममता बॅनर्जी प्रचार करतील व सहानुभूती मिळवतील याची भीती भाजपला वाटत असेल तर भाजप हा तकलादू मुद्दय़ांवर प. बंगालच्या मैदानात उतरला आहे. पंतप्रधान मोदींनाही अधूनमधून हुंदके फुटतात. अश्रूंचा बांध फुटतो, ते बरे चालते. पण ममतांच्या पायास जखम झाली हा मात्र लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न! आपल्या निवडणुका आता खोटेपणा व सहानुभूती या दोन शस्त्रांनीच लढल्या जातात. प. बंगालात दोन्ही बाजूंनीच या शस्त्रांचा खणखणाट सुरू आहे. फक्त फरक असा की, भारतीय जनता पक्षाला तेथे तोडीस तोड उत्तर मिळत आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना, हिंमत असेल तर नंदीग्राममधून आपल्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान देताच ममता बॅनर्जी यांनी वाघिणीप्रमाणे भक्ष्यावर झेप घेतली व नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात निवडणुकीचा अर्ज भरला. अशी हिंमत ज्या वाघिणीमध्ये आहे तिच्यासमोर कुणाचा निभाव लागणार? ममतांच्या लंगड्या पायास भाजपवाले घाबरले ते त्यामुळेच! असा निशाणा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातुन केंद्र सरकारवर साधला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -