भांडुपमधील श्रीराम कॉलेजमध्ये अनेक विषयांसाठी प्राध्यापकच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्राध्यापकांअभावी तासिकाच होत नसल्याने शिक्षण कसे पूर्ण करायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्याचबरोबर सोईसुविधांचा अभाव असल्याने मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विद्यार्थी संघटनेकडे करत यातून मार्ग काढण्याची विनंती केली आहे.
‘गुरूंविना शिक्षण नाही’, असे आपल्याकडे म्हटले जाते. त्यामुळे मुलांना शाळेत किंवा कॉलेजमध्ये पाठवण्याकडे पालकांचा कल असतो. परंतु भांडुपमधील श्रीराम सायन्स व कॉमर्स कॉलेजकडून विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारूनही विद्यार्थ्यांना अनेक विषयांसाठी प्राध्यापकच उपलब्ध करून दिले जात नाहीत. प्राध्यापक नसल्याने कॉलेजमध्ये तासिकाच होत नसल्याने विद्यार्थ्यांना कोणतेही शिक्षण मिळत नाही. त्यामुळे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होत नसल्याने परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. प्राध्यापक नसण्याबरोबरच कॉलेजमध्ये अस्वच्छ स्वच्छतागृहे, वॉटर फिल्टर्सचा अभाव, वर्गांमध्ये बसण्यासाठीची अस्वच्छ बाके यासारख्या असुविधांमुळे विद्यार्थी हैराण झाले आहे.
त्याचबरोबर मुलींसाठीचे कॉमन रूम बंद असून, त्यांच्यासाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनही कॉलेजमध्ये बसवलेले नाहीत. यासंदर्भात कॉलजे प्रशासनाकडे दुर्लक्ष करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अखेर विद्यार्थ्यांनी युवासेनेचे सिनेट सदस्य वैभव थोरात यांच्यांकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांच्या समस्या व तक्रारींची दखल घेत युवासेनेच्या शिष्टमंडळाने कॉलेजला भेट देत तेथील प्राचार्यांना साईसुविधा पुरवण्याच्या व प्राध्यापकांची तातडीने नियुक्ती करण्यासंदर्भात निवेदन दिल्याची माहिती युवासेनेचे सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी दिली.