लॉकडाऊनमुळे अवयवदानामध्ये घट झाली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून अवयवदानाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. २०२१ या वर्षात दोन महिन्यांमध्ये सहा वेळा यशस्वी अवयवदान झाले आहे. २६ फेब्रुवारीला मुंबई विभागातील सहावे यशस्वी अवयवदान नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात झाले. ५१ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे तीन व्यक्तींना जीवदान मिळाले.
तीन व्यक्तींना जीवदान
नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या ५१ वर्षीय महिलेचा २६ फेब्रुवारीला मेंदमृत झाला. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने महिलेच्या कुटुंबियांना तिचे अवयवदान करण्याबाबत माहिती दिली. अवयवदानाबाबत माहिती मिळाल्यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. महिलेचे हृदय, यकृत आणि मूत्रपिंड हे अवयव दान करण्यात आले. दान करण्यात आलेले अवयव तातडीने गरजू रुग्णांना पाठवण्यात आले. अवयवदानाच्या या निर्णयामुळे तीन व्यक्तींना जीवदान मिळाल्याची माहिती विभागीय अवयव प्रत्यारोप समितीकडून देण्यात आली.