मुंबईतील परळच्या बैलघोडा या हॉस्पिटलमध्ये एका कुत्र्यावर शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातून तब्बल ६० छोटे-छोटे मुतखडे काढण्यात आले आहेत. शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झालं किंवा पाण्याचं सेवन कमी झालं की मनुष्याच्या पोटात मुतखडे होतात. तसेच प्राण्यांच्या पोटातही मूतखडे होतात. मंगळवारी असाच एक पाळीव कुत्रा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी त्याला तात्काळ तपासलं. वैद्यकीय चाचणीत मूत्राशयात खडे असल्याचं निदान झालं. मंगळवारी संध्याकाळी तातडीने त्याच्यावर सर्जरी करण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेतून त्याच्या मूत्राशयातून तब्बल ६० मूतखडे काढण्यात आले आहेत.
प्राण्यांनाही होऊ शकताता मनुष्यासारखे खडे
माणसांप्रमाणे कुत्र्यांनाही मूत्राशयातील खड्यांची समस्या होऊ शकते. मालक घरात नाही म्हणून घरातील प्राणी अनेकदा पाणी पिणं टाळतात. शिवाय, जर प्राण्यांना बरं वाटतं नसेल तरीही प्राणी पित नाहीत. त्यामुळे, त्यांनाही मनुष्यासारखे खडे होऊ शकतात. त्यातून लघवी तुंबण्याचे ही प्रकार होतात.
प्राणी आणि मनुष्याच्या शरीराची जडणघडण सारखीच
याविषयी अधिक माहिती देताना परळच्या बैलघोडा हॉस्पिटलचे सचिव डॉ. जे. सी. खन्ना यांनी सांगितले की, “मनुष्याप्रमाणे प्राण्यांनाही मूतखडा होऊ शकतो. कारण, प्राणी आणि मनुष्याच्या शरीराची जडणघडण ही सारखीच असते. या कुत्र्याला ही मूतखड्याचा त्रास होता. अनेक दिवस मूत्राशयात लघवी तुंबल्याने या कुत्र्याला त्रास जाणवायला सुरुवात झाली होती. त्याच्या मालकांनी त्यांना मंगळवारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्याचं दिवशी त्याच्या तपासण्या केल्यानंतर त्याला मूतखड्याचा त्रास होतोय ते कळलं. ते खडे मूत्राशयातून काढण्यासाठी शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नव्हता. या शस्त्रक्रियेतून तब्बल ६० हून अधिक खडे काढण्यात आले. खरंतर एक, दोन खडे आढळण्याची समस्या प्राण्यांमध्ये असते पण, एकाच वेळी ६० खडे आढळणं अशी केस फारच दुर्मिळ असते.”
यात शस्त्रक्रिया करून खडे काढणे हा एकमेव पर्याय असतो.
तसंच, अनेकदा कुत्र्यांना टॉमेटो खायला घातला जातो. त्यातून खडे होण्याची शक्यता असते. त्यातच बऱ्याचदा कुत्र्यांना लघवीची समस्या असल्याचं लगेच कळत नाही. कुत्र्यांच्या बदललेल्या वागणुकीवरुन कळतं की त्यांना काहीतरी त्रास होतोय. जसे की, खाणं-पिणं सोडणं, घरी एका कोपऱ्यात बसून राहणं अशा प्रकारे प्राणी वागतात. तसंच, लघवी खूप दिवस तुंबल्याने मूत्रपिशवी फाटू शकते. त्यातून मृत्यूही होऊ शकतो. तसंच घराबाहेर फिरायला नेताना श्वानांनी वेळेवर लघवी केलीय किंवा नाही याकडे लक्ष ठेवले पाहिजे. प्रकृती बिघडत असल्याचं लक्षात आल्यास तातडीने डॉक्टरांकडे उपचार करून घेतल्यास श्वान बरा होऊ शकतो, असंही डॉ. खन्ना यांनी स्पष्ट केलं आहे