मुंबई विद्यापीठाचे युथ फेस्टिवल म्हणजे विद्यार्थी वर्गांसाठी पर्वणीच असते. आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी असते. मात्र विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा फटका या युथ फेस्टिवल दरम्यान आपली कला सादर करणार्या विद्यार्थ्यांना बसत आहे. सध्या मुंबई विद्यापीठात युथ फेस्टिवलच्या अंतिम फेरीची स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये रंगली आहे. गुरूवारी युथ फेस्टिवलच्या गायन स्पर्धा आणि सामूहिक गायन स्पर्धेची अंतिम फेरी होती. ती स्पर्धा गिरगाव येथील विल्सन कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र ऐन वेळी स्पर्धेचे ठिकाण बदलून ही स्पर्धा चर्चगेट येथील शाहीर अमर शेख सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यामुळे स्पर्धकांची चांगलीच तारांबळ उडाली.
मुंबईत सध्या सर्व कॉलेजांमध्ये युथ फेस्टिव्हलची जोरदार तयारी सुरू आहे. विद्यार्थ्यांनी कालपर्यंत असे गृहीत धरले होतेकी, त्यांची अंतिम फेरीची स्पर्धा विल्सन कॉलेज येथे होणार आहे. त्यानुसार सकाळी ९ सुमारास त्यांनी विल्सन कॉलेज गाठले. पण तिथे पोहोचल्यावर तिथल्या सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवले. त्यानंतर चौकशी केल्यावर असे कळले की, स्पर्धेचे ठिकाण काल रात्रीच बदलले. याची माहिती स्पर्धकांना दिली नव्हती. धावपळ करत स्पर्धक तिथे पोहोचले. योग्य समन्वय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. या संदर्भात मुंबई विद्यापीठाशी संपर्क केला असताना तो होऊ शकला नाही.
काही दिवसांपूर्वीच मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टच्या अंतिम फेरीचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला. यानंतर मुंबईतील चर्चगेट येथील शाहीर अमर शेख सभागृह येथे अंतिम फेरीला सुरुवातदेखील झाली आहे. मुंबई,ठाणे,पालघर या सारख्या अनेक भागातील महाविद्यालयांनी येथे आपले सादरीकरण केले. सभागृहातील लिफ्ट बंद असल्याने विद्यार्थ्यांची ताणाताण झाली. लिफ्टदेखील बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपले सामान स्वतः उचलून घेऊन जावे लागले.