मुंबई महापालिकेच्या नायर व केईएम हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलांनी जन्म दिलेली बालके ही निगेटिव्ह असल्याची अनेक प्रकरणे समोर आली. अशातच जन्मजातच बाळाला हृदयविकार असलेल्या ३० मुलांवर कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या रुग्णांमध्ये सात दिवसांच्या तान्ह्या बाळापासून १४ वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. ही मुले हिंगोली, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, सांगली, जळगाव, उस्मानाबाद, पुणे, ठाणे, मुंबई अशा ११ जिल्ह्यांतील असून, यामध्ये अन्य राज्यातील बाळांचाही समावेश आहे.
मुंबईतील्या धारावीसारख्या कोरोना प्रतिबंधक क्षेत्रातील सात दिवसांची सर्वात लहान रुग्ण होती. तिला आर्क दुरुस्तीसाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. एप्रिलमध्ये झालेल्या या शस्त्रक्रियेनंतर दोन आठवड्यांनी बाळाला घरी सोडण्यात आले. नाशिकच्या तीन महिन्यांच्या बाळाचा फेरी अम्ब्युलन्सच्या मदतीने एका गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये आणले. त्याशिवाय मे महिन्यात सांगलीहून आलेल्या एक वर्ष चार महिने वयाच्या छोट्या मुलावरही शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या हृदयामध्ये भोक होते आणि त्यामुळे त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. ही शस्त्रक्रियाही यशस्वीपणे पार पडली.स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने रुग्णांच्या कुटुंबियांना तपशीलवार नियोजन करण्यात मदत केली.
संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना ३० हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. या मुलांना तातडीच्या वैद्यकीय सेवेची गरज होती. शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यापेक्षा ती केल्याने अधिक फायदा होणार असल्याने आम्ही शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
– डॉ. सुरेश राव,संचालक, चिल्ड्रेन हार्ट सेंटरपालकांनी आपले मूल जन्मजात हृदयविकाराचा कसा सामना करेल याचा विचार करून दुःखी होऊ नये, वेळेवर निदान झाल्यास योग्य व्यवस्थापन करता येते आणि बाळाला नेहमीसारखे वाढवून आनंदी जीवन देता येऊ शकते.
– डॉ. स्नेहल कुलकर्णी,सल्लागार, पेडिअट्रिक कार्डिओलॉजी