मणक्याच्या आजारावर तीन वेळा शस्त्रक्रिया केल्यानंतरही सर्वसामान्य आयुष्य जगता येत नसलेल्या महिलेवर सरकारच्या जीटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही महिला कामा हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत आहे. या महिलेच्या पाठीच्या मणक्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये तीन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. पण, तिचे दुखणे कायम होते. हे तिन्ही महागडे प्रयत्न फोल ठरले. दरम्यान, गोकुळदास तेजपाल म्हणजेच जीटी या राज्य सरकारच्या हॉस्पिटलमध्ये मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे त्यांना या आजारापासून कायमची सुटका मिळाली.
खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार म्हणजे महागडे असले तरी चांगले उपचार असल्याचे बोलले जाते. पण, संचिता रावराणे यांना खासगी हॉस्पिटलमध्ये केलेल्या शस्त्रक्रियेचा अनुभव फारच वाईट होता. काही वर्षांपूर्वी त्यांना पाठीच्या मणक्याच्या आजाराने ग्रासले. यावर उपचार म्हणून मुंबईतीलच खासगी हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या शस्त्रक्रिया केल्या. तरीही मणक्याच्या दुखण्यावर कोणताही फरक पडला नाही. त्यानंतर त्यांनी एका खासगी हॉस्पिटलमध्ये मणक्यात स्क्रू घालण्याची शस्त्रक्रिया करून घेतली. त्यानंतरही त्यांना कंबरदुखी, पाठदुखी, चालण्यास होणारा त्रास, पायाला कळ येणे आणि मुंग्या येणे यांसारखे त्रास सुरुच होते. त्यांच्या पायाचा पंजाही बधीर होत गेला. अखेर त्यांनी आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांची भेट घेत मणक्याच्या आजाराबद्दल माहिती घेतली. त्यानंतर अस्थिव्यंग उपचार तज्ज्ञ डॉ. धीरज सोनावणे यांनी तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या ढिल्या झालेल्या मणक्यातून स्क्रू काढण्यात आले. हे स्क्रू काढत असताना नसांच्या इजा होण्याच्या अडचणींवर मात करण्यासाठी न्यूरो मॉनिटरींग मशीन बाहेरून मागवण्यात आली. भूल देऊन या मशीनमधील वायर्समधून करंट पास करून नसांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे नसा मोकळ्या करून मणका सरळ केला. ही किचकट शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वी केली. त्यामुळे, लाखोंचा खर्च टळला आणि उपचाराला लागणाऱ्या वस्तूंसहित अवघ्या ५० हजारांमध्ये शस्त्रक्रिया पार पडली.
” रुग्णावर पूर्वी तीनदा शस्त्रक्रिया झाली होती. त्यांचा सरकलेला मणका जाग्यावर बसवण्यात आला. आधीच्या शस्त्रक्रियेदरम्यान बसवलेले स्क्रू काढून पुन्हा नव्याने शस्त्रक्रिया केली. आता त्यांना आराम पडतोय. महिलेवर तीन वेळा आधीच शस्त्रक्रिया केल्यामुळे चौथ्यांदा शस्त्रक्रिया करणं कठीण होतं. पण, आम्ही ही शस्त्रक्रिया योग्य रितीने केली आणि त्यांना कायमस्वरुपी आजारातून मुक्तता दिली. ”
– डॉ. धीरज सोनावणे, अस्थिव्यंग उपचार तज्ज्ञ, जीटी हॉस्पिटल.