डोंबिवली हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट असतानाच, पालिकेच्या बीएसयुपीच्या इमारतीत १०० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यातले २५ जण तबलिगी आहेत, अशी धक्कादायक माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट द्वारे दिली आहे. या तबलिगींना शहराबाहेर अन्यत्र हलविण्यात यावे अशी मागणी आमदार पाटील यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. तसेच ट्विट द्वारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेही लक्ष वेधले आहे.
— Raju Patil (@rajupatilmanase) April 21, 2020
कल्याण डोंबिवली शहरात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. डोंबिवली हॉटस्पॉट बनत असतानाच पाथर्ली भागात काही दिवसांपूर्वी कोरोनाचा एक रूग्ण आढळून आला आहे. येथून जवळच असलेला आजदे, सागर्ली भाग पण हॉटस्पॉट जाहीर केला आहे. अशातच काही संशयित रूग्ण ज्यामध्ये काही तबलिगींचा समावेश आहे, असे एकूण १०० च्यावर लोक बीएसयुपीमध्ये ठेवले आहेत. हॉटस्पॉटमध्ये आढळून आलेले रूग्ण त्या जागेपासून दूर नेणे अपेक्षित असताना, उलट बाहेरचे संशयित या शहरात दाट वस्तीच्या ठिकाणी आणणे योग्य नाही. मात्र, याच गोष्टींची माहिती आजूबाजूच्या परिसरात समजल्यावर लोकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आधीच कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या डोंबिवलीत या तबलिगींची उपस्थिती जर लोकांमध्ये भीती निर्माण करत असेल आणि त्यामुळे भविष्यात प्रशासनावर ताण येणार असेल तर या लोकांना लवकरात लवकर डोंबिवली शहराबाहेर इतरत्र हलवावे अशी विनंती आमदार पाटील यांनी आयुक्तांना केली आहे. डोंबिवली रहिवासी भागात अजून बाहेरचे संशयित रूग्ण आणू नका, अशी फोनवर विनंती केली होती, असेही आमदारांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.