मुंबईकरांचा प्रवास पुन्हा एकदा महाग होणार आहे. कारण येत्या 1 ऑक्टोबरपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होणार आहे. सध्या महागाई वाढली असून, वाढत्या महागाईच आता रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ झाल्याने सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. (Taxi and Rickshaw fare increases in mumbai from 1st October)
येत्या 1 ऑक्टोबरपासून टॅक्सीचे किमान भाडे 28 रुपये आणि रिक्षाचे भाडे 23 रुपये होणार आहे. सध्या टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपये आहे. तसेच, रिक्षाचे भाडे 21 रुपये आहे. याशिवाय, रात्रीच्याही म्हणजेच रात्री 12 नंतरच्या भाड्यात वाढ होणार आहे. टॅक्सीचे रात्रीचे भाडे आता 32 रुपयांवरुन 36 रुपये होणार आहे. तसेच, रिक्षाचे रात्रीचे भाडे 27 रुपयांवरुन 31 रुपये होणार आहे.
मुंबईकरांच्या खिशाला आता 1 ऑक्टोबरपासून कात्री लागणार आहे. मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षाचालक-मालक गेल्या काही दिवसांपासून भाडेवाढ करण्यासाठी आग्रही होते. सीएनजीचे भाव वाढत आहेत. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून भाडेवाढ करण्यासाठी टॅक्स आणि रिक्षाचालक मागणी करत होते.
शुक्रवारी रिक्षा, टॅक्सीचालकांची राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाली आणि या बैठकीत भाडेवाडी संदर्भात सरकारकडून रिक्षा, टॅक्सीचालकांना हिरवा कंदील मिळाला आहे. मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून (एमएमआरटीए) या भाडेवाढीला मंजुरी देण्यात येते. त्यामुळे सरकारकडून तत्त्वत: मंजुरी मिळाल्यानंतर ‘एमएमआरटीए’ भाडेवाढीला अंतिम मंजुरी आज देणार आहे, अशी माहिती टॅक्सी युनियनने दिली आहे.
हेही वाचा – येत्या वर्षभरात शहराचा पाणीप्रश्न तडीस नेणार, पालकमंत्री होताच संदिपान भुमरेंचा मोठा दावा